Nitesh Rane : आपण सगळे हिंदू आहोत, मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी का होत नाही?, नितेश राणेंचा सवाल
नितेश राणेंनी रत्नागिरीतून मुंब्रा नामांतर, जात पडताळणी आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. मुंब्राचे नाव 'मुंब्रादेवी' करण्याचे संकेत देत, ते 'पुन्हा हिंदूमय करण्याचे काम करत आहोत' असे म्हणाले. त्यांनी प्रशासनातील 'सडक्या आंब्यांवर' जात पडताळणी प्रकरणी टीका केली, तर पृथ्वीराज चव्हाण व संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली आहेत. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशीव करण्यात आलं. काही शहरांचीही नावं बदलण्यात आली. आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या उपनगराचे नाव बदलून ‘मुंब्रादेवी’ ठेवण्याबद्दलही बऱ्याच काळापासून चर्चा सुरू असून याचसंदर्भात आता भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भाष्य केलं आहे. तिरंगा यात्रेत सहभागी झाल्यानंतर ते रत्नागिरी येथून बोलत होते. पहिले आपण सगळे हिंदूच होतो, परत हिंदूमय करण्याचे काम आम्ही लोक करत आहोत, असं ते म्हणाले. तसेच विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना महाविकास आघाडी तसेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावेळी राणे यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यांच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडली.
मुंब्र्याच्या नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांनी या संदर्भातील नाव लवकरच जाहीर होईल, असे संकेत दिले. “पहिले आपण सगळे हिंदूच होतो. पुन्हा हिंदूमय करण्याचे काम आम्ही करत आहोत,” असे ते म्हणाले. इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामकरण करण्यात आलं ना, मग मुंब्र्याचे मुंब्रादेवी असे नामकरण का होऊ नये, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. त्यामुळे मुंब्र्याच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जात पडताळणी प्रकरणावर अधिकाऱ्यांवर निशाणा
जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर राणे यांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर थेट निशाणा साधला. त्यांच्या खात्यात काही “सडके आंबे” असून, काही अधिकारी चुकीचे परवाने देतात आणि त्यांच्या कारभारामुळे सरकारची बदनामी होते, असा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेला मुद्दा चुकीचा नव्हता, तर तो योग्य होता, असेही राणे यांनी स्पष्ट केले. जात पडताळणीच्या प्रक्रियेत काही मराठा तरुणांना डावलले गेले, हा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, या प्रकरणासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदार धरणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी हा प्रकार खालच्या पातळीवरील काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाल्याचा दावा केला.
पृथ्वीराज चव्हाणांवर थेट हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना राणे यांनी काँग्रेसच्या सध्याच्या राजकीय स्थितीसाठी त्यांनाच जबाबदार धरले. चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आणि त्याच कारणामुळे काँग्रेस आजही विरोधी पक्षात असल्याचा दावा त्यांनी केला. एवढंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा अधिकार पृथ्वीराज चव्हाण यांनी गमावला असल्याचे राणे म्हणाले.
संजय राऊतांवरही टीकास्त्र
यावेळी नितेश राणे यांनी निवडणूक आयोगासंदर्भातील संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर जोरदार टीका केली. “ हा काय तिथे चहा पाजायला होता का?” असा सवाल करत त्यांनी निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. देशात संविधान, कायदे आणि नियम असून भारत हा लोकशाही मानणारा देश असल्याचे राणे यांनी नमूद केले.
