जातीपातीच्या राजकारणावरुन नितीन गडकरींचा संताप, म्हणाले “जो करेगा जात की बात, उसके…”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जात, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगावरून भेदभाव करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी ५०,००० लोकांना जातवादाला पाठिंबा देणाऱ्यांना कठोरपणे प्रतिसाद देण्याचा इशारा दिला.

जातीपातीच्या राजकारणावरुन नितीन गडकरींचा संताप, म्हणाले जो करेगा जात की बात, उसके...
nitin gadkari
| Updated on: Mar 16, 2025 | 3:34 PM

एखादी व्यक्ती त्याच्या जाती, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगावरून ओळखली जात नाही. तर केवळ त्याच्या गुणांवरून ओळखली जाते. मी 50 हजार लोकांना सांगितलंय की जो करेगा जात की बात, उसके कस के मारूंगा लात, असे स्पष्ट वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले.

माणसाकडे असलेल्या गुणांमुळे माणूस मोठा होतो

नागपूरमध्ये आज दीक्षांत समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यता आले होते. “यावेळी त्यांनी जात, धर्म, पंथ यावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केले. तुम्ही दिवसातून अनेक वेळा नमाज पठण करा. मात्र नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. इंजिनिअर, डॉक्टर, आयएएस तयार झाले तरच समाजाचा विकास होईल. जात, पंत, भाषा लिंग आणि धर्मामुळे माणूस ओळखला जात नाही तर माणसाकडे असलेल्या गुणांमुळे माणूस मोठा होतो”, असेही नितीन गडकरी म्हणाले.

जातीच्या आधारे बरेच लोक मला भेटायला येतात

“एखादी व्यक्ती त्याच्या जाती, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगावरून ओळखली जात नाही. तर केवळ त्याच्या गुणांवरून ओळखली जाते. म्हणूनच आपण जात, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगावरून कोणाशीही भेदभाव करणार नाही. मी राजकारणात आहे आणि येथे हे सर्व चालू आहे. परंतु मला मते मिळतील किंवा नाही, तरीही मी हे नाकारतो. जातीच्या आधारे बरेच लोक मला भेटायला येतात. मी ५०,००० लोकांना सांगितले, ‘जो करेलगा जात की बात, उसके कस के मारूंगा लात.’ माझ्या मित्रांनी मला सांगितले की मी हे बोलून स्वतःचे नुकसान केले असेल. पण मला त्याची चिंता नाही; जर कोणी निवडणूक हरला तर तो आपला जीव गमावत नाही. मी माझ्या तत्वांवर टिकून राहीन”, असे नितीन गडकरींनी म्हटले.

हजारो विद्यार्थी इंजिनिअर झाले

“मी निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद मिळाले नाही तर मी काय मरणार नाही. मात्र मी माझ्या भूमिकेवर आधीपासून ठाम आहे आणि राहील. मी आमदार असताना अंजुमन-ए-इस्लाम इन्स्टिट्यूट (नागपूर) इंजिनिअरिंग कॉलेजला परवानगी दिली होती. मुस्लीम समाजाला याची गरज आहे, असे मला वाटत होते. मुस्लीम समाजातून अधिकाधिक अभियंते, आयपीएस, आयएएस अधिकारी निर्माण झाले तर सर्वांचा विकास होईल. माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे. अंजुमन-ए-इस्लामच्या बॅनरखाली आज हजारो विद्यार्थी इंजिनिअर झाले आहेत,” असेही नितीन गडकरींनी सांगितले.