मोठी बातमी! महाराष्ट्र कृषी दिनीच फडणवीसांची शेतकऱ्यांना गुड न्यूज, सर्वात मोठी घोषणा, आता तो ताण कायमचा मिटणार
आज सर्वत्र महाराष्ट्र कृषीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. कृषी दिनानिमित्त कृषी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

आज महाराष्ट्र कृषीदिन आहे. कृषीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी पुरस्कार वितरणत सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार सध्या शेतकऱ्यांसाठी कोण-कोणत्या योजना राबवत आहे? आणि भविष्यात कोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत? तसेच सरकारचं कृषीच्या प्रगतीसाठी काय धोरण आहे, याबाबत माहिती दिली. आज शेती क्षेत्रातील यांत्रीकरणासाठी सर्वात जास्त बजट हे महाराष्ट्र सरकारचं आहे. आता सर्व प्रकाचं बियाणं हे आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्टिफाईड करणं सक्तीचं करण्यात आलं आहे, त्यामुळे नकली बियांण्यांना आळा बसून, शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आणले तर मोठ्या प्रमाणात खर्चाला आळा बसतो, त्यामुळे आपण देशातील कृषी क्षेत्रावर आधारीत पहिलं एआय अॅप विकसीत केलं आहे. आपल्या कृषी विभागाकडे अॅप आहे. मागील 3 वर्षांत फलोत्पादनात क्षेत्रात आपण पुढे आलो आहोत. पशुपालनाच्या क्षेत्रात येत्या काळात मोठा विस्तार करण्याचा विचर सरकार करत आहे, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात वातावरणीय बदलाच्या अनुशंगाने शेती कशी करायची यावर ही विचार सुरू आहे.
दरम्यान यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांना अजूनही रात्रीच्या वेळीच वीज मिळत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर बोलताना त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12 ही महिने आम्ही दिवसा वीज देऊ, सध्या स्थितीमध्ये आम्ही राज्यातील 75 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ शकतो. तर हे वर्ष संपेपर्यंत आम्ही 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणार आहोत, अशी घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली आहे. सुरुवातील आठ तास दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा करू, त्यानंतर शेतीला दिवसा 12 तास वीज उपलब्ध करू दिली जाईल असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.