आजपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू, आठवडाभरात तोडगा निघाला नाहीतर शेतकरी…

| Updated on: Feb 28, 2023 | 8:19 AM

आजपासून पुन्हा नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू झाले आहे. सोमवारी कांद्याचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडल्याने बाजार समितीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

आजपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू, आठवडाभरात तोडगा निघाला नाहीतर शेतकरी...
Image Credit source: Google
Follow us on

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर ( Onion Rate ) हे मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये ( Farmer News ) प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. त्याच दरम्यान शेतकऱ्यांनी सोमवारी ( 27 फेब्रुवारी ) ला संपूर्ण राज्यात कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. सकाळपासून शेतकरी आक्रमक झाले होते. यामध्ये विविध संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीतही कांद्याचे लिलाव बंद होते. त्यामुळे एकट्या लासलगाव बाजार समितीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारला लिलाव बंद ठेवले तर मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने शासन पातळीवर दखल घेण्यात आली होती.

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः अर्थसंकल्पीयन अधिवेशन संपताच नाशिककडे धाव घेतली होती. लासलगाव बाजार समितीत जाऊन शेतकाऱ्यांशी आणि आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले होते.

आठवडाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना यांच्या प्रतिनिधीची चर्चा केली जाईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी भूमिका दादा भुसे यांनी घेतली होती.

हे सुद्धा वाचा

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्याच दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मार्ग सोडविला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. तब्बल दहा तासांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू होते. त्यात दादा भुसे यांच्या शिष्टाईला यश आले.

आठ दिवसांच्या आत याबाबत बैठक होणार असल्याचे आश्वासन दादा भुसे यांनी दिले आहे. त्यामध्ये काय निर्णय होतो याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार हे निश्चित आहे.

संपूर्ण राज्यात खरंतर ठिकठिकाणी कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले होते. बाजार समितीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. कुठे रास्ता रोको करण्यात आला, तर कुठे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले. सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आंदोलकांना यश मिळाले होते.

2 ते 4 रुपये किलो कांद्याला भाव मिळत आहे. लाल कांद्याची ही स्थिती असतांना उन्हाळ कांद्याची काय स्थिती असणार असा अंदाज बांधत शेतकरी नाराजी व्यक्त करत होते. एकंदरीत कांदा उत्पादक शेतकरी यांच्यात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.