दिल्लीत मोठ्या घडामोडी, शरद पवार यांच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?

| Updated on: Mar 23, 2023 | 7:07 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अतिशय महत्त्वाच्या विषयांवर खलबतं होत असल्याची माहिती मिळत आहे.

दिल्लीत मोठ्या घडामोडी, शरद पवार यांच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्र (Maharashtra) आणि देशातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi) फार मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अतिशय महत्त्वाच्या विषयांवर खलबतं होत असल्याची माहिती मिळत आहे. देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. याशिवाय लोकसभेनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या दोन्ही निवडणुका महाराष्ट्रातील सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला देखील लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.

या सगळ्या घडामोडी घडत असतानाच देशातील सर्व विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यासाठी विरोधी पक्षांकडून मोठी रणनीती आखली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

बैठकीत ‘या’ नेत्यांचा समावेश

शरद पवार यांच्या घरी शिवसेनेचे नेते अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, जेडीयूकडून अनिल हेगडे, डी राजाराम गोपाल यादव, बीआरएसचे केशव राव, सीपायएमचे एल राम करीम यांच्यासह आणखी काही नेते बैठकीसाठी हजर झाले आहेत. या बैठकीत ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी या बैठकीबद्दल माहिती दिलेली. ईव्हीएम बाबत ही बैठक होणार आहे. सगळ्या विरोधी राजकीय पक्षांना निमंत्रण दिलं आहे. ईव्हीएम व्यतिरिक्त इतर विषयांवर ही चर्चा होऊ शकते, अशी माहिती सुनील तटकरे यांनी आधीच दिलीय. संसदेचं सध्या अधिवेशन सुरु आहे. पण लोकसभा आणि राज्यसभेचं अद्याप काहीच कामकाज झालेलं नाही, याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी या बैठकीनंतर देशात ईव्हीएमबाबत संभ्रम आहे, असं मत मांडलं. तर वकील कपिल सिब्बल म्हणाले, “आम्ही अनेकवेळा निवडणूक आयोगकडे ईव्हीएम मशीनचा दुरुपयोग होतोय हे सांगितलं. आता जनतेमध्येपण भ्रम आहे. पण आयोग यावर उत्तर देत नाहीय. जोपर्यंत आयोग ईव्हीएम मशीनबाबत उत्तर देत नाही त्यानंतर मग आम्ही राजकीय पक्ष निर्णय घेऊ. जगात कोणतंही मशीन कंट्रोल केलं जाऊ शकतं. इतर देशात त्याचा वापर होत नाही तर मग आपल्या देशात वापर का?”