Osmanabad | उस्मानाबादेत बर्निंग कारचा थरार.. रस्त्यावरच्या प्रवाशांचा श्वास रोखला, सुदैवानं जीवितहानी नाही!

फायर ब्रिगेडच्या पाण्याच्या फवाऱ्यांनीच कारची आग शांत करण्यात आली. ही आग शांत झाल्यावर कारचा फक्त सांगाडाच उरला होता. आगीत भस्मसात झालेल्या कारचे दृश्यही आणखीच भयावह होते.

Osmanabad | उस्मानाबादेत बर्निंग कारचा थरार.. रस्त्यावरच्या प्रवाशांचा श्वास रोखला, सुदैवानं जीवितहानी नाही!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 5:59 PM

उस्मानाबाद : वाढत्या उन्हाच्या झळांनी (Heat wave) मराठवाड्यातील नागरिक हैराण असून दुपारच्या वेळी शक्यतोवर अनेकजण घरातच राहण्याचा प्रयत्न करत आहेत. भर दुपारी वाहन घेऊन बाहेर पडण्याचं धाडस फार कमी जण करतात. त्यातल्या त्यात दुचाकीवर तर कुणी अति आवश्यक नसेल तर बाहेर पडतच नाही. सूर्य आग ओकत (Summer) असताना वाहन दूरच्या प्रवासात वाहन घेऊन जाणं किती धोकादायक ठरू शकतं, याचंच एक ज्वलंत उदाहरण देणारी घटना उस्मानाबादेत (Osmanabad) घडली. भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दुपारी अचानक पेट घेतला. सुदैवानं वाहनातील प्रवाशांना या प्रकाराची कल्पना आली. त्यामुळे त्यांनी समयसूचकता दाखवत तत्काळ बाहेर पडण्याचे ठरवलं. मात्र त्यानंतर गाडीनं जो पेट घेतला तो पाहून सर्वांचा काळजाचा ठोका चुकला.

कुठे घडली घटना?

उस्मानाबाद जिल्ह्यातील आळणी येथे एका चार चाकी गाडीने असा पेट घेतला. या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारमधून प्रवासी बाहेर पडल्यानंतर कारचा अचानक भडका उडाला. आगीच्या ज्वाला एवढ्या भीषण होत्या की रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचा श्वास अक्षरशः रोखला गेला. आगीच्या ज्वाला आणि धुरांचे लोट आकाशात जात होते. हा भीषण प्रकार पाहून अनेकजण थांबले. कारचालकाला काही मदत कऱण्याचा प्रयत्न केला.

फायर ब्रिडेगच्या मदतीनं आग विझवली

उस्मानाबादेत आळणी इथं झालेल्या या घटनेत कारला लागलेली आग विझवण्यासाठी अखेर अग्निशामक दलाची मदत घ्यावी लागली.फायर ब्रिगेडच्या पाण्याच्या फवाऱ्यांनीच कारची आग शांत करण्यात आली. ही आग शांत झाल्यावर कारचा फक्त सांगाडाच उरला होता. आगीत भस्मसात झालेल्या कारचे दृश्यही आणखीच भयावह होते.