दादा, सरकारमध्ये या, अजित पवार यांना खुली ऑफर; ऑफर देणारा बडा मंत्री कोण?

शिंदे सरकारमधील एका बड्या मंत्र्याने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. राज्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी आमच्यासोबत यावं, असं या नेत्याचं म्हणणं आहे.

दादा, सरकारमध्ये या, अजित पवार यांना खुली ऑफर; ऑफर देणारा बडा मंत्री कोण?
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 16, 2023 | 11:27 AM

शिर्डी : अजित पवार यांच्याबद्दल मला अतिश आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करू नये. संजय राऊत सारखे लोक रोज बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र दादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्यांने घेते. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्या बरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे, असं सांगतानाच दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे, असं राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना थेट खुली ऑफर दिल्याने ते या ऑफरवर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्री दीपक केसरकर हे शिर्डीत आले होते. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे, असंही ते म्हणाले. दंगली करणारे सत्तेवर बसले तर दंगली होणारच नाहीत. त्यांनी दंगली केल्या असं मी म्हणत नाही. कोल्हापुरात जी दंगल घडली त्यात एकही माणूस शहरातील नव्हता. बाहेरून आलेले हे लोक होते. दंगल होणार हे नेत्यांना अगोदर कसं कळतं? सामाजिक ऐक्य राखणं सर्वांचंच काम आहे. तुम्ही दंगली भडकवणार आणि आमच्या आरोप करणार हे चालणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.

बोंडेंनी माणुसकी दाखवली

जाहिरातीच्या मुद्द्यावरूनही केसरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. जाहिरातीचे पैसे चेकने दिले. ते स्वत: देवू शकतात. किती दिवस घाणेरडी भाषा वापरत राहणार?, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावरही टीका केली. स्वत:च्या मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हणणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात त्यांनी बोंडे यांना सुनावले. अनिल बोंडे यांनी आपल वक्तव्य मागे घेतलं. त्यांनी माणुसकी दाखवली, असं त्यांनी सांगितलं. तुम्ही किती काम केल आणि शिंदेनी किती काम केल हे जनतेला समजू द्या, असं आव्हानच त्यांनी महाविकास आघाडीला यावेळी दिलं.

केंद्रात मंत्रीपद मिळणार

यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केलं. केंद्रात आम्हाला 100 टक्के मंत्रिपद मिळणार आहे. काही खाती रिक्त आहेत. त्याचा विचार होईल. कोणतं खातं मिळेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच ठरवतील. मात्र, जी संधी मिळेल त्याचा महाराष्ट्रासाठी उपयोग करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.