महिलांवरील अत्याचार थांबू दे, सर्वांना सुबुद्धी दे; यशोमती ठाकूरांचं महालक्ष्मीला साकडं
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी गौरी आवाहन केले. महालक्ष्मीची स्थापना करून महालक्ष्मीकडे राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले.
अमरावती : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी गौरी आवाहन केले. महालक्ष्मीची स्थापना करून महालक्ष्मीकडे राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले.
“आदिमाया, आदिशक्ती, महालक्ष्मी राज्यातील प्रत्येक माणसाच्या घरात धनधान्य, सुखसौख्य, समृद्धी नांदू दे यंदा पाऊसकाळ चांगला झालाय अशीच तुझी कृपा राहू दे, अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लढण्याचं बळ दे. बळीराजाला जसं पावसाचं दान दिलं, तसंच राज्यातील कोविडची महामारी लवकरात लवकर दूर कर, केंद्रातल्या सरकारने वाढलेली महागाई आणि बेरोजगारी लवकरात लवकर कमी कर. मुख्य म्हणजे या राज्यातील माय भगिनींच्या पोषणासाठी, सशक्तीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी झुंजण्याचे बळ दे. महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे माय, माय भगिनींच्या रक्षणासाठी सरकारचे हात अधिक मजबूत कर गं माय”. अशा शब्दात महालक्ष्मी मातेकडे राज्याच्या हितासाठी ठाकूर यांनी साकडे घालून प्रार्थना केली.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोझरी येथील निवासस्थानी श्री.महालक्ष्मी मातेचे आगमन झाले.कोरोनाचा प्रकोप कमी करुन सर्वांना निरोगी दिर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना यावेळी केली.#गौरी_पूजन #महालक्ष्मी pic.twitter.com/J5FMbfs3bU
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) September 13, 2021
शेतकऱ्यांना बळ दे; देवेंद्र फडणवीसांचं गणरायाला साकडं
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. या विघ्नहर्त्याच्या स्थापनेच्या निमित्तानं आपण त्यांना साकडं घालूया की, जगासमोर, देशासमोर, महाराष्ट्रासमोर जे कोरोनाचं संकट आहे, ते संकट आता दूर झालं पाहिजे. आपलं जीवन पूर्वीसारखं सुचारू झालं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रावर जी सारखी संकटं येतात, कधी पुराचं, कधी वादळाचं तर कधी अतिवृष्टीचं आहे, यातूनही आमच्या शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी. शेतकऱ्याला बळ मिळावं आणि गणरायाने त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी गणराया चरणी प्रार्थना आहे. त्याचसोबत गणरायाने आपल्या सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा द्यावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
इतर बातम्या
(Give everyone a good intellect, Yashomati Thakur’s prayer to Mahalaxmi)