महामोर्चाचा संबंध थेट सत्तांतराशी?; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Dec 15, 2022 | 1:23 PM

जतच्या पाणी प्रश्नात मीच मार्ग काढला. हे फक्त आमदार सांभाळण्यात गुंतलेत. मी काही केलं नाही म्हणऱ्यांना समोर बसवा. त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे.

महामोर्चाचा संबंध थेट सत्तांतराशी?; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
महामोर्चाचा संबंध थेट सत्तांतराशी?; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली: महापुरुषांचा वारंवार होणाऱ्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन केलं आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. सरकारला मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल. हा मोर्चा आता थांबणार नाही, असं सांगतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर थेट या महामोर्चाचा राज्यातील सत्तांतराशी संबंधच जोडला आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोर्चाची माहिती देतानाच राज्य सरकारवर जोरदार हल्लाही चढवला. महापुरुषांचा अवमान करण्याची स्टाईल भाजपकडे सुरू आहे. इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला तर काय प्रतिक्रिया येतात हे भाजप पाहतंय. महाराष्ट्राच्या निष्ठेची स्थानं डॅमेज करण्याचे काम भाजपने केलं आहे. त्याविरोधात हा मोर्चा आहे. महाराष्ट्रातला हा मोर्चा बघून भारतीय जनता पक्षाला धडकी बसेल. आपण केलेल्या सत्तांतराला किती कमी प्रतिसाद आहे हे त्यांच्या लक्षात येईल, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढले. भाजपचे अनेक नेते वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहेत. त्याचा या मोर्चातून निषेध केला जाणार आहे. राज्य सरकारला मोर्चासाठी परवानगी द्यावीच लागेल. परवानगी न देण्याचा वेडेपणा सरकार करणार नाही, असं पाटील म्हणाले.

मोर्चाची परवानगी मिळावी म्हणून चर्चा सुरू आहे. आता मोर्चा थांबणार नाही. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोर्चासाठी येणार आहेत. राज्यपालांनी राज्यपाल झाल्यापासून कोणती चांगली गोष्ट केली आहे यावर चर्चा होऊ शकते. पण आम्ही सगळे सहन केलंय. पण महापुरुषांचं अवमान होतो, तेव्हा आम्ही गप्प कसे बसणार? असा सवाल त्यांनी केला.

भाजपच्या नेत्यांनी सांगितलेलेच निर्णय राज्यपालांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार ही एकच गोष्ट राज्यपालांना माहीत नव्हती. बाकी सगळ्या गोष्टी सांगून सुरू आहेत. पण आता हद्द झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

जतच्या पाणी प्रश्नात मीच मार्ग काढला. हे फक्त आमदार सांभाळण्यात गुंतलेत. मी काही केलं नाही म्हणऱ्यांना समोर बसवा. त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. भाजपने काही लोक बाळगले आहेत, ते भुंकण्यासाठी सोडले आहेत. माळावर भूंकणाऱ्यांकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.