Big Breaking : सरकारचं डेथ वॉरंट निघालं… फिनिश… पुष्पचक्र अर्पण करा, सरकार कधी पडणार?; संजय राऊत यांनी दिवसच सांगितले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावच्या पाचोरा येथे सभा आहे. या सभेला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांनी आज सभेच्या तयारीचा आढावा घेतला.

Big Breaking : सरकारचं डेथ वॉरंट निघालं... फिनिश... पुष्पचक्र अर्पण करा, सरकार कधी पडणार?; संजय राऊत यांनी दिवसच सांगितले
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 23, 2023 | 10:19 AM

जळगाव : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना डिवचले आहे. गुलाबराव पाटील यांची गुलाबो गँग असल्याचं सांगतानाच आज पाटील यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. कोरोना काळात गुलाबराव पाटील यांनी कसा भ्रष्टाचार केला याची माहितीच संजय राऊत यांनी दिली. तसेच गुलाबराव पाटील यांच्या पाणीखात्यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा दावा करतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? ते काय भ्रष्टाचाऱ्यांची टोळी चालवत आहेत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे. येत्या 15 ते 20 दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

जळगावच्या पाचोऱ्यात आज ठाकरे गटाची महासभा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून जळगावात असून सभेच्या तयारीचा आढावा घेत आहेत. आजही त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं. अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठीचा आकडा जमवू शकतात, असं म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मोठं भाकीत केलं.

पुष्पचक्र अर्पण करा

प्रत्येकजण आपआपली गणितं मांडत असतात. आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. सध्याचे मुख्यमंत्री आणि 40 लोकांचे राज्य आहे. ते पुढच्या 15 ते 20 दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. मी मागे एकदा सांगितलं होतं. फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकाल उशिरा लागतोय. हे सरकार टिकत नाही. या सरकारचा मृत्यू लेख लिहिला गेला आहे. डेथ वॉरंट निघालं आहे. आता फक्त सही कधी आणि कुणी करायची हेच बाकी आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे. फिनिश. पुष्पचक्र अर्पण करा, असं संजय राऊत म्हणाले.

त्यांना घेणार नाही?

शिवसेनेशी गद्दारी करून जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यांना पुन्हा पक्षात घेणार का? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं सांगितलं. आम्ही पक्षातून गेलेल्यांना परत घेणार नाही. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. पक्षाच्या विचाराशी गद्दारी केली आहे, असं संजय राऊत म्हणाले. जो गये, वो भगवान को प्यारे हो गये, असंही ते म्हणाले. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना आता ठाकरे गटात येण्याचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा आहे.