शेतकरी बांधवांनो खचून जाऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी : धनंजय मुंडे

| Updated on: Sep 13, 2021 | 11:39 PM

शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

शेतकरी बांधवांनो खचून जाऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी : धनंजय मुंडे
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे
Follow us on

परळी (बीड) : गेल्या काही दिवसात परळी तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, तूर, उडीद मूग, फळबागा आदी उभी पिके पाण्याने अक्षरशः नासून गेली आहेत. या काळात शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यादृष्टीने संयुक्त पंचनामे व अन्य कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत, असे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील अतिवृष्टी पाहणी दौऱ्यादरम्यान म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांचा शेतकऱ्यांशी संवाद

परळी तालुक्यातील डिग्रस, पोहनेर, बोरखेड, तेलसमुख, ममदापुर आदी गोदा काठच्या गावांना धनंजय मुंडे यांनी आज भेटी देऊन शेती पिकांचे नुकसान झालेल्या ठिकाणी बांधांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर गोदावरी सह विविध नद्यांना आलेल्या पूरपरिस्थितीचा व त्यामुळे रस्त्यांसह झालेल्या विविध नुकसानीचाही मुंडेंनी आढावा घेतला.

गुडघाभर चिखल पायदळी तुडवत नुकसानीची पाहणी

दुपारनंतर अचानक मोठ्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या गावांच्या भेटीदरम्यान धनंजय मुंडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी डोक्यावर कोसळणाऱ्या धो-धो पावसातच अगदी गुडघाभर चिखल पायदळी तुडवत शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.

या दौऱ्यात धनंजय मुंडे यांच्यासह परळी न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, संजय गांधी निराधार समितीचे प्रमुख राजाभाऊ चाचा पौळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान नाना मुंडे, पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, प्रभाकर पौळ, चंद्रकांत कराड, नितीन काकडे, प्रदीपराव खोसे, विशाल श्रीरंग, राजाभाऊ निर्मळ, सुभाष नाटकर, वैजनाथ कदम, कैलास जाधव, भागवत बप्पा कदम, पप्पू जाधव यांसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

मुंडेंचा दौरा झाला अन् ‘त्या’ गावांचा रस्त्याचा प्रश्न लागणार निकाली…

या दौऱ्या दरम्यान धनंजय मुंडे यांनी बोरखेड, तेलसमुख आदी गावांमध्येही भेटी देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रमुख्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या मागण्या तसेच पाणंद रस्त्यांच्या मागण्या ग्रामस्थांनी उपस्थित करताच, संबंधित कामांवरील स्थगिती येत्या काही दिवसातच उठणार आहोत. अल्पावधीतच या रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

इसिसचे दहशतवादी रशियात घुसखोरी करणार? पुतीन यांनी पाठवली 30 रणगाड्यांची कुमक, कधीही युद्धाची ठिणगी

…आणि अभियंता 1 लाख घेताना रंगेहात पकडला गेला, फक्त अहवालासाठी प्रकल्पबाधिताकडून 5 लाखांची मागणी