शरद पवार कलाकार, त्यांची चावी कुठं बी चालते; गुलाबराव पाटील यांची तुफ्फान फटकेबाजी

| Updated on: Mar 26, 2023 | 7:44 AM

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धक्कादायक विधान केलं आहे. पुढाऱ्यांना भानगडी पाहिजे असतात, भानगड केली नाही तर आमचं पोट भरत नाही, असं खळबळजनक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

शरद पवार कलाकार, त्यांची चावी कुठं बी चालते; गुलाबराव पाटील यांची तुफ्फान फटकेबाजी
gulabrao patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची सभेला नेहमीच गर्दी असते. त्याला कारणही तसंच आहे. गुलाबराव पाटील आक्रमक भाषण करतात. तसेच ते मिश्किल टोलेबाजीही करतात. शेरोशायरी, किस्से आणि संदर्भ देत देत गुलाबराव पाटील कधी कुणाची टोपी उडवतील याचा नेम नसतो. तसेच बोलता बोलता एखादी धक्कादायक माहिती देऊन ते राज्याच्या राजकारणात खळबळही उडवून देतात. बिनधास्त आणि खुसखुशीत शैलीत बोलण्यासाठी गुलाबराव पाटील प्रसिद्ध आहेत. कालही त्यांनी जळगावात आपल्या खास आक्रमक आणि खुसखुशीत शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. हे सांगतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कधी काय करतील याचा भरवसा नसल्याचंही सांगून टाकलं.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या चिंचपुरे गावात विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमातून त्यांनी अनेक धक्कादायके विधाने केली आणि त्यांची ही विधाने बातमीचा विषय झाली. ते पवार आहेत ना, कलाकार आहेत… आणि पवार म्हणजे की चावी आहेत. ती चावी कुठं बी चालते. त्यांनी काँग्रेसला पटवले, उठोबा पटोबाचा एक माणूस पटवला. अशी मिसळ तयार झाली अन् 11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले, असं गुलाबराव पाटील म्हणाले. गुलाबराव पाटील यांनी हे विधान करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हे सुद्धा वाचा

काय रुबाब आहे ना

यावेळी गुलाबराव पाटील यांनी सुरुवातीच्या काळातील शिवसेनेतील संघर्षाच्या आठवणी सांगितल्या. आपला प्रवास कुठून कुठपर्यंत झाला याची माहितीच त्यांनी दिली. जे पोलीस आधी पकडायचे ते आता संरक्षण करायला माझ्या मागे असतात, असं गुलाबराव म्हणाले. 1990/92 मध्ये गणपती उत्सवात तेव्हा पोलीस मला पकडण्यासाठी माझ्या मागे असायचे. गणपती, दुर्गा पूजा, शिवजयंती असे सण आले की पोलीस मला पकडण्यासाठी मागे असायचे. पण आता बरं वाटतं, पोलिसांची एक गाडी मागे एक गाडी पुढे, काय रुबाब आहे ना? माणसाचे दिवस कसे बदलतात, असं ते म्हणाले.

पुढाऱ्यांना भानगडी हव्या असतात

आमच्या पुढाऱ्यांना भानगडी पाहिजे असतात, भानगड केली नाही तर आमचं पोट भरत नाही, असं खळबळजनक विधानही त्यांनी केलं. चिंचपुरा गावाने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जोपासली आहे त्याचे कौतुक करताना त्यांनी हे विधान करत एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या या विधानाची सध्या जळगावात जोरदार चर्चा आहे.