कोकणचा विकास ते हिंदुत्व… सर्वच विषयांवर बोलणार; नव्या वर्षात राज ठाकरे यांची तोफ कोकणातून धडाडणार

मुंबई आणि ठाण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांची पाईपलाईन तुंबलीय. पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये ती मोकळी होईल.

कोकणचा विकास ते हिंदुत्व... सर्वच विषयांवर बोलणार; नव्या वर्षात राज ठाकरे यांची तोफ कोकणातून धडाडणार
राज ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 03, 2022 | 1:01 PM

रत्नागिरी : तुम्हालाही पैशाची अमिषे आलेत. कुणा कुणाला ऑफर आल्या हे मला माहीत आहे. तरीही तुम्ही फुटले नाहीत. याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील मनसेच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. तसेच मी जानेवारीत पुन्हा कोकणात येणार आहे. त्यावेळी कोकणच्या विकासापासून ते हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत सर्वच विषयांवर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे नव्या वर्षात राज ठाकरे यांची तोफ कोकणातून धडाडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजपासून कोकण दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मनसेच्या बांधणीसाठी राज ठाकरे कोकणात आले आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी रिफायनरी समर्थकांचे पोस्टर झळकले आहेत. राजापूर शहराच्या हद्दीवर राजापूर नगरीत राज साहेब ठाकरे यांचे स्वागत असं या पोस्टरवर लिहिलं आहे. रा ठाकरे यांनी आज सकाळी साडेदहा वाजता रिफायनरी समर्थकांची भेट घेतली. त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

या भेटीनंतर राज ठाकरे यांनी एका छोटेखानी सभेला संबोधित केलं. यावेळी काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. गाव तिथे शाखा सुरू करा. फोडाफोडीचे कार्यक्रम सुरू आहेत. पण महाराष्ट्र सैनिक फुटत नाही, त्याचा अभिमान आहे. पैशाचे अमिष दाखवले जात आहे. कुणाकुणाला किती ऑफर गेल्या हे मला माहीत आहे. तुमचं कडवट असणं हे यशात रुपांतर होईल, असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबई आणि ठाण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांची पाईपलाईन तुंबलीय. पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये ती मोकळी होईल. त्यापूर्वी म्हणजे जानेवारीत मी कोकणात येणार आहे. कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार की नाही ते पाहील. मला जे काही बोलायचं आहे ते तेव्हा बोलले. कोकण विकास, हिंदुत्व, मराठी माणूस यावर बोलणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, बारसू सोलगाव रिफायनरी संदर्भातराज ठाकरे यांची भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज यांनी सभेत या विषयावर भाष्य केलं नाही. त्यामुळे मीडियाशी संवाद साधताना ते या विषयावर बोलणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us