बीडमध्ये कोरोनाने आई-वडील गमावलेल्या मुलांना शांतिवन देणार हक्काचं घर

| Updated on: May 31, 2021 | 4:42 AM

शांतिवन संस्थेने बीडमध्ये आपले आई-वडील गमावलेल्या अनाथ मुलांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलाय.

बीडमध्ये कोरोनाने आई-वडील गमावलेल्या मुलांना शांतिवन देणार हक्काचं घर
Follow us on

बीड : कोरोनाने सगळीकडेच थैमान घातलंय. यात काही मुलांनी आपली आई गमावलीय, कुणी वडील तर कुणी दोघांनाही गमावलं आहे. अशा अनाथ मुलांचा मोठा प्रश्न तयार झालाय. हाच प्रश्न आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन बीडमधील शांतिवन संस्था पुढे सरसावली आहे. शांतिवन संस्थेने बीडमध्ये आपले आई-वडील गमावलेल्या अशा मुलांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलाय. यानुसार संबंधित मुलांची माहिती संकलित करुन याबाबत कार्यवाही केली जात आहे (Shantivan NGO working on orphan childrens due to corona in Beed and Maharashtra).

या मोहिमेत जीवघेण्या ठरलेल्या कोरोना विषाणूची लागण होऊन ज्या गरीब घरातील मुलांनी आपल्या आपल्या आई-वडिलांना किंवा दोघांपैकी एकाला गमावले आहे अशा 0 ते 18 वयोगटातील अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी स्विकारली जाणार आहे. या अनाथ मुलांना त्यांचं हक्काचं मायेचं घर देण्याचा निर्णय शांतिवनने घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक दिपक नागरगोजे यांनी दिली.

अनाथ मुलांचा गंभीर प्रश्न, शांतिवनचा पुढाकार

कोरोनाने जो धुमाकूळ घातला त्या संकटात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. काही बाळांनी आपल्या लाडक्या पालकांना गमावले आहे. बीड जिल्हा, मराठवाडा आणि राज्यातही अनेक मुलं अनाथ झाली आहेत. काही मुलांनी आपला एक पालक गमावला, तर काहींनी आपल्या दोन्हीही पालकांना गमावलं आहे. प्रचंड जीवितहानी करणाऱ्या या संकटाने हजारो लेकरांना पोरकं केलं आहे. ज्या गरीब कुटुंबातील बालकांवर ही वेळ आली आहे त्या बालकांवर पालनपोषण आणि संगोपन करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

“मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पुण्यात व्यवस्था करणार”

0 ते 18 वयोगटातील या बालकांना शांतिवनमध्ये हक्काचे घर देऊन त्यांचे पालन पोषण संगोपन आणि शिक्षण करण्याचा निर्णय शांतिवनने घेतला आहे. ही मुलं शांतिवनमधील अधिकृत कायदेशीर असणाऱ्या शिशुगृहात (0 ते 06 वयोगट), बालगृहात (06 ते 18 वयोगट) वाढवण्यात येतील. शांतिवनच्या शाळेत त्यांचे शिक्षण करण्यात येईल. तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी शांतिवनच्या पुण्यातील प्रकल्पात त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आई-वडील गमावलेल्या मुलांना उत्तम पालक मिळवुन देण्याचाही प्रयत्न होणार

दोन्ही पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बाळांना नातेवाईकांच्या संमतीने आणि कायदेशीर मार्गाने सधन कुटुंबात दत्तक देऊन उत्तम पालक मिळवुन देण्याचा प्रयत्नही शांतिवन करणार आहे. शांतिवनच्या दत्तक विधान केंद्र हे काम ‘कारा’, ‘सारा’ या सरकारी संस्थेच्या माध्यमातून करणार आहे.

अनाथ मुलांची माहिती देण्याचं संस्थेचं आवाहन

शांतिवन संस्थेने नागरिकांना आवाहन केलंय की बीड जिल्ह्यातील किंवा राज्यातील अशी बालके निदर्शनास आल्यास त्या नातेवाईकांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी शांतिवनशी संपर्क साधावा. संपर्क साधण्यासाठी संस्थेने 9923772694, 7028372694, 9421282359 या हेल्पलाईन जारी केल्या आहेत. याशिवाय deepshantiwan99@gmail.com हा संस्थेचा ईमेलही जारी केलाय. नागरिकांनी या ठिकाणी संपर्क करण्याचं आवाहन शांतिवनने केलंय.

हेही वाचा :

Photo | माणुसकीने उजळली दिवाळी, बच्चू कडूंचे वृद्धांना अभ्यंगस्नान, पुरणपोळीचं जेवण

व्हिडीओ पाहा :

Shantivan NGO working on orphan childrens due to corona in Beed and Maharashtra