‘जिलेटीनच्या कांड्या ते मोठं षडयंत्र, उद्धव ठाकरे बारसूत पोहोचताच…’, निलेश राणे यांचा धक्कादायक दावा

| Updated on: May 03, 2023 | 7:21 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आहेत. त्यांच्या बारसू दौऱ्याआधी रत्नागिरीत मोठं काहीतरी षडयंत्र रचलं जात असल्याचा धक्कादायक दावा निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

जिलेटीनच्या कांड्या ते मोठं षडयंत्र, उद्धव ठाकरे बारसूत पोहोचताच..., निलेश राणे यांचा धक्कादायक दावा
Follow us on

सिंधुदुर्ग : माजी खासदार निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या 6 मे ला रत्नागिरीत बारसू गावाला भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बारसूत मोठी तयारी सुरु आहे. बारसूत षडयंत्र रचलं जातंय. जिलेटिनच्या काड्या गोळा केल्या जात आहेत. विषय खूप गंभीर आहे, असं निलेश राणे म्हणाले. विशेष म्हणजे या प्रकरणाशी उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही, असंही निलेश राणे यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे 6 मे ला बारसूत येणार आहेत. त्या दिवशी मोठं काहीतरी घडवण्याचे षडयंत्र होत असल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. “बारसूमध्ये काही दिवसांपासून जे घडतंय ते सांगण्यासाठी मी ही पत्रकार परिषद बोलावली आहे. जनतेला आणि अधिकाऱ्यांना या गोष्टी कळाव्यात हा यामागील उद्देश आहे. तिथे बोअरवेल मारण्याचे काम सुरू आहे. उद्धव ठाकरे तिथे 6 तारखेला येणार असल्याचे कळले. त्यासाठी मागच्या दरवाजाने अनेक तयारी सुरू आहेत, अस मला कळलं”, असं निलेश राणे म्हणाले.

निलेश राणे यांचा नेमका दावा काय?

“जिलेटीन स्टिक गोळ्या करण्याचे काम काही लोक करत आहेत. ते कशासाठी मला माहित नाही. ज्यांना 6 तारखेला काही घडवायचं आहे ते लोक असा प्रयत्न करता आहेत. ही बाहेरची लोकं आहेत. याची माहिती मी उद्या पोलिसांना आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे”, अशी माहिती निलेश राणे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“बाहेरच्या लोकांना 6 तारखेला वातावरण चिघळवायच आहे. हे बाहेरचे लोक आहेत. यात उद्धव ठाकरे यांचा काही संबंध नाही. हा विषय फार सिरीयस घ्या म्हणून मी पालकमंत्री यांना सांगणार आहे. जर हा विषय निलेश राणेंना कळतो याचा अर्थ काही तरी घडतंय म्हणूनच ना?”, असं निलेश राणे म्हणाले.

“जिलेटीन स्टीकचा हा एक विषय माझ्या कानावर आला. अजून काही विषय असू शकतात. असं मटेरियल एका आंदोलनासाठी इथे यायला लागलं तर फार गंभीर विषय आहे. काहीतरी कट आहे. त्याचा शोध पोलिसांनी आता घ्यायला हवा”, असं निलेश राणे म्हणाले.

निलेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

“उद्धव ठाकरेंसारखी बाहेरची लोक बारसूचं वातावरण बिघडवत आहेत. हा प्रकल्प गेला तर यानंतर कोकणात 5 कोटींचा ही प्रकल्प येणार नाही. हा चौथा प्रकल्प जाईल”, अशी टीका निलेश राणे यांनी केली. तसेच “उद्धव ठाकरे बारसूला चिघळवायला येत असतील तर या प्रकल्पाला समर्थन किती मोठ्या प्रमाणात आहे हे दाखवण्यासाठी समर्थन मोर्चा काढावा लागेल. विरोध करायचा आणि ठेके मिळवायचा अशी उद्धव ठाकरे यांची पद्धत आहे”, असा आरोप निलेश राणे यांनी केला.

निलेश राणे यांचा राजन साळवी यांच्यावर निशाणा

यावेळी निलेश राणे यांना राजन साळवी यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी कडक शब्दांत टीका केली. “खासदार राजन साळवी यांना कुत्र विचारत नाही. आम्ही त्याला काडीची किंमत देत नाही. त्यांना हिंमत असेल तर त्यांनी बारसूत जाऊन दाखवावं. आम्ही बारसूत जाऊन आलो. जैतापूर प्रकल्प आणण्यासाठी आम्ही सर्व पणाला लावलं होतं”, असं निलेश राणे म्हणाले.

यावेळी निलेश राणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षासाठी त्यांनी का असं केलं? हे त्यांनाच माहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोडून अध्यक्ष शरद पवारच रहावेत असे सर्वांना वाटते”, असं निलेश राणे म्हणाले.