शेती, फळपिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान द्या; राजेश टोपेंचे निर्देश

| Updated on: Sep 09, 2021 | 7:53 PM

जालना जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपीक, फळपिकांसह पावसाचे पाणी घरामध्ये गेल्याने नागरिकांच्या सामानाच्या झालेल्या नुकसानीची पालकमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

शेती, फळपिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान द्या; राजेश टोपेंचे निर्देश
Follow us on

जालना : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपीक, फळपिकांसह पावसाचे पाणी घरामध्ये गेल्याने नागरिकांच्या सामानाच्या झालेल्या नुकसानीची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष भेट देत पहाणी केली. उपस्थितांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेत शेत व फळपिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे अशा कुटूंबांना सानुग्रह अनुदान तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. (Submit immediate report on damage of agriculture and fruit crops, Rajesh Tope’s instructions to the officers)

यावेळी पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून मूग, कापूस, सोयाबीन, उडिद, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन मोसंबी व द्राक्ष या फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

वीज पुरवठा पुर्ववत करा

अतिवृष्टीमुळे अनेक गावातील वीजेच्या खांबाचे मोठे नुकसान झाल्याने गावातील घरांबरोबरच शेतीच्या वीजेचा पुरवठा खंडित झाला आहे. जालना जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे वीजेचा पुरवठा खंडित झाला आहे याची माहिती घेऊन वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे निर्देश यावेळी उपस्थित विद्युत विभागांच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.

पावसामुळे घराचे नुकसान झालेल्यांना सानुग्रह अनुदान द्या

मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये नदीकाठी व ओढ्याच्या काठी घरे असलेल्या अनेक गोरगरीब कुटूंबांच्या अन्नधान्य, कपडे, भांडी तसेच घरावरील पत्र्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या ज्या गावात अशाप्रकारे नुकसान झाले असेल त्या प्रत्येक गावात नुकसानीचे पंचनामे करुन बाधित कुटूंबांना शासन निर्णयाप्रमाणे सानुग्रह अनुदान तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देत तलाठी, कृषी सहायक यांनी नुकसानग्रस्त एकही गोरगरीब मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळवा

पंतप्रधान पिकविमा योजना खरीप हंगाम 2021 साठी जालना जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरंस विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. पंतप्रधान पिकविमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन गारपीट, ढगफुटी, अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. या जोखमीअंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढवून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शिरुन दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे 72 तासांच्या आत नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. त्यामुळे शेती, फळबागा तसेच इतर नुकसानाची माहिती तातडीने विमा कंपनीकडे अथवा आपल्या गावातील कृषी सहाय्यकांकडे सादर करण्याचे आवाहनही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी पालकमंत्री टोपे यांनी अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे दिलावर पठाण, रफिक इब्राहिम बेग, सय्यदा शेख उसमान यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच यावेळी झालेल्या नुकसानाची माहिती घेऊन पावसामुळे नुकसान झालेल्या मूग, उडीद, कापूस, मोसंबी, ऊस आदी पिकांची पहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

सुखापुरी येथे सुभाष भुतेकर, अफसर गणी शेख, मोहन शिंदे यांच्या घराच्या झालेल्या नुकसानाची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. पद्मावती नदी काठावर असलेल्या गावांना पुराच्या पाण्याचा नेहमी धोका असल्याने या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी घरकुले उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी पालकमंत्री टोपे यांनी अंबड तालुक्यातील धाकलगाव, लखमापुरी, करंजळा, घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा व मोहपुरी या गावांना भेटी देऊन त्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची पाहणीही केली.

इतर बातम्या

बाप हा बापच असतो, पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नको; विनायक राऊतांनी नितेश राणेंना डिवचले

Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड

राणेंना चिपी विमानतळाचं श्रेय घेण्याचा अधिकार नाही, फुशारक्या मारताना भान ठेवा; विनायक राऊतांचा जोरदार हल्ला