Bachchu Kadu : त्यांचं सिंदूर तुम्हाला दिसत नाही का? बच्चू कडू यांचा सरकारला सवाल

"तुम हट गये तो मेरे पास पवार साहेब और उद्धव साहेब आहे, अशा प्रकारचे राजकारण भाजप व्यवस्थित खेळत आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरे व शरद पवार भाजपाला पाठिंबा देईल असं नाही पण तसं दर्शविले जात आहे" असं बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu : त्यांचं सिंदूर तुम्हाला दिसत नाही का? बच्चू कडू यांचा सरकारला सवाल
bachchu kadu
| Edited By: | Updated on: Jul 29, 2025 | 1:48 PM

भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव राबवत काल पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्या विषयावरुन बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “धर्माचे नाव देऊन 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा काढतात, मात्र 6 लाख शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत, त्याची चर्चाही करायला सरकार तयार नाही” अशी टीका बच्चू कडू यांनी केली. “त्यांना देवी-देवतांचे फक्त नाव वापरायचे आहे. लोकांना धर्मामध्ये गुंतून ठेवायचं आहे, पण तो महादेवाचा त्रिशूल शेतकऱ्याच्या छाताड्यात खूपसायचा अशी अवस्था आणली आहे” अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

“सहा लाख हिंदू आया बहिणींच सिंदूर उधळलं गेलं, त्यावर मोदीजी आणि फडणवीस बोलायला तयार नाही, साधी श्रद्धांजली सुद्धा द्यायला तयार नाही. त्यामुळे असे नवीन नवीन नाव काढत आहेत” अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
“28 लोकांसाठी सिंदूर यात्रा काढली ते मान्य आहे, पण सहा लाख शेतकरी यांनी पाय घासून घासून आत्महत्या केली, त्यांच्यासाठी तुम्हाला सिंदूर आठवत नाही. ते सिंदूर तुम्हाला दिसत नाही, याच्यासारखं दुर्देव काय आहे?” असं बच्चू कडू म्हणाले.

हा खेळ शेवटी भाजपचा

“सगळ्यांना व्यवस्थित कसे ठेवायचे यासाठी हा खेळ शेवटी भाजपचा आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहा यांचा फोन आला. उद्धव ठाकरे यांनाही शुभेच्छा दिल्या. केंद्रामध्ये उद्या नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांनी हालचाल करू नये, त्यांना व्यवस्थित इशारा या माध्यमातून देण्यात आला” असं बच्चू कडू म्हणाले.

तुम हट गये तो मेरे पास…

“तुम हट गये तो मेरे पास पवार साहेब और उद्धव साहेब आहे, अशा प्रकारचे राजकारण भाजप व्यवस्थित खेळत आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरे व शरद पवार भाजपाला पाठिंबा देईल असं नाही पण तसं दर्शविले जात आहे” असं बच्चू कडू म्हणाले.

संभ्रमाचं चित्र भाजप तयार करतय

“मित्र पक्षांवर दबाव तंत्र आणण्याचा व्यवस्थित प्रयत्न आहे. लोकांना खेळ समजून द्यायचा नाही. एकंदरीत संभ्रमाचं चित्र भाजप तयार करत आहे” असं बच्चू कडू म्हणाले.

Follow Us