मृतदेह रस्त्यावर… भर उन्हात आक्रोश आणि मातम… वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात, 12 ठार, 25 जखमी; पालघरसह महाराष्ट्रावर शोककळा
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज (सोमवार) भीषण अपघात झाला. लग्नाचा निघालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या आयशर ट्रकची कंटेनरला जोरदार धडक बसल्याने 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

पालघरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज (सोमवार) भीषण अपघात झाला. लग्नाचा निघालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या आयशर ट्रकची कंटेनरला जोरदार धडक बसल्याने 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलला आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू असून, अनेकांटची प्रकृती चिंताजणक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा अपघात पालघर जिल्यातील धानीवरी गावाजवळ झाला. सुमारे 100 जण लग्न समारंभासाठी आयशर ट्रकमधून प्रवास करत होते. त्याचवेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रकची समोरील कंटेनरला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की ट्रकचा ताबा सुटून तो रस्त्यावर पलटी झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाला.
जखमींवर उपचार सुरू
या भीषण अपघातानंतर अनेक जण वाहनाखाली आणि ट्रकमध्ये अडकले होते. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिकांनी पोलिस आणि रुग्णवाहिकांना माहिती दिल्यानंतर प्रशासनाची पथके घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयात हलवले जाऊ शकते. तसेत या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी
समोर आलेल्या माहितीनुसार वऱ्हाडाच्या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. हा अपघात अतिवेग, चालकाचे दुर्लक्ष किंवा इतर कोणत्या तांत्रिक कारणामुळे झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या अपघातानंतर प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. या अपघातामुळे मालवाहू वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करण्याच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
