धनंजयना पंकजा म्हणाल्या विकासासाठी शुभेच्छा, तर ते काय म्हणाले? वाचा सविस्तर

| Updated on: Feb 05, 2021 | 4:28 PM

पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. तर धनंजय मुंडे यांनीही जिल्ह्याचा विकास आपल्या खांद्यावर घेतल्याचं सांगितलं.

धनंजयना पंकजा म्हणाल्या विकासासाठी शुभेच्छा, तर ते काय म्हणाले? वाचा सविस्तर
Follow us on

बीड : वारकरी संप्रदायातील थोर संत वैकुंठवासी वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी लाखो भक्तांच्या उपस्थितीत गहिनीनाथ गडावर पार पडला. या सोहळ्यानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले होते. या व्यासपीठावरुन बोलताना पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. तर धनंजय मुंडे यांनीही जिल्ह्याचा विकास आपल्या खांद्यावर घेतल्याचं सांगितलं.(Pankaja Munde and Dhananjay Munde on the same stage)

पंकजा मुंडेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जयदत्त क्षीरसागर, राम शिंदे आणि आपण या जिल्ह्याच्या विकासासाठी बराच निधी दिल्याचा दावा यावेळी पंकजा मुंडे यांनी केला. पण यावेळी कुठला मंत्री किंवा नेता म्हणून नाही तर भक्त म्हणून गहिनीनाथ गडावर आल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. आज देण्यासाठी आपल्याकडे काही नाही. त्यामुळे फक्त प्रेम द्यायला आणि आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो आहोत, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. आजवर जे देता आलं ते दिलं. तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं केलं. मुंडे साहेबांनी दिलेला स्वाभिमानाचा कणा वाकू दिला नाही, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. आमच्या हातात जे होतं ते आम्ही केलं. आता पुढची पाच वर्षे विकास करण्यासाठी नव्या हातांमध्ये सत्ता आली आहे. ते जिल्ह्याला विकासाची कमी भासू देणार नाहीत, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

‘जिल्ह्याचं मागसलेपण दूर करणार’

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केल्यानंतर येणाऱ्या 4 वर्षात जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्याचं आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख देण्याचं आव्हान आपण स्वीकारल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. या गहिनीनाथ गडाची, या मतदारसंघाची आणि बीड दिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आपण सर्वांच्या साक्षीनं आपल्या खांद्यावर घेत असल्याचं घोषणाच धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. जनतेच्या मनात जनतेचं मन सांभाळून काम केलं तर आशीर्वाद कमी पडत नाहीत. आजच्या संकटातही आपल्या डोक्यावर जनतेचे आशीर्वाद असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंकजा मुंडे यांना टोला

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात पालकमंत्री असताना मोठा विकासनिधी दिल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना मागच्या पालकमंत्र्यांनी 25 कोटी रुपयांची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात 2 कोटी रुपयेच मिळाले, हे भिमराव धोंडे यांनीच सांगितल्याची कोटी धनंजय मुंडेंनी केली. पण आता मागचे जे राहिलेले पैसे आहेत त्यापेक्षा 5 कोटी जास्त देऊन राहिलं काम येत्या 2 वर्षात पूर्ण करुन दाखवेल, असा दावाही धनंजय मुंडे यांनी केलाय.

मुंडे भगिनींवर जेसीबीतून फुलांची उधळण

पंकजा मुंडे व खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांच्यावर सर्व सामान्य जनता व कार्यकर्त्यांचे किती अलोट प्रेम आहे, याची प्रचिती आज पुन्हा आली. गहिनीनाथ गडावर आगमन झाल्यानंतर व्यासपीठाकडे जातांना कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावर जेसीबीने फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत केले. या स्वागताने मुंडे भगिनीही भारावून गेल्या होत्या.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडेंपाठोपाठ पंकजाही गहिनीनाथ गडावर, मुंडे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर

पंकजांसमोर धनंजय मुंडे म्हणाले, या मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो!

Pankaja Munde and Dhananjay Munde on the same stage