Patwardhan Family Dispute : भाग्यश्री यांनी गणपती मंदिरात केलं ते कृत्य चुकीचंच; आरतीचा मान घेतल्याने संतापले विजयसिंह राजे पटवर्धन
सांगलीच्या आराध्य दैवताच्या गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी पदावरून पटवर्धन कुटुंबात वाद उफाळला आहे. अभिनेत्री भाग्यश्री यांनी नूतन युवराज आदित्यराजे यांना डावलून वारसदार असल्याचा दावा करत मंदिरात आरती केली. यावर अधिपती विजयसिंहराजे पटवर्धन यांनी भाग्यश्रीचे कृत्य चुकीचे असून १९४० च्या कायद्यानुसार आदित्यराजेच युवराज राहतील, असं स्पष्ट केलं. त्यांच्या आरोग्यविषयक चर्चांनाही पूर्णविराम दिला.

शंकर देवकुळे, प्रतिनिधी : सांगलीचे आराध्यदैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरातील धार्मिक विधी आणि सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारीपदावरून पटवर्धन कुटुंबातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. अभिनेत्री राजकन्या भाग्यश्री पटवर्धन यांनी नूतन युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना डावलून गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन उत्सवमूर्तीची आरती केल्याने या वादाला तोंड फुटले. या घटनेनंतर संस्थानच्या उत्तराधिकारीपदाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पटवर्धन कुटुंबातील मतभेद चर्चेचा विषय ठरले आहेत.या पार्श्वभूमीवर सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. १९४० च्या संस्थान कायद्यानुसार युवराज आदित्यराजे पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली असून, यापुढे संस्थानचा युवराज म्हणून आदित्यराजेच काम पाहतील, हा आपला निर्णय असल्याचे विजयसिंहराजे यांनी स्पष्ट केले.
भाग्यश्री यांनी जे केलं ते चुकीचंच
भाग्यश्री पटवर्धन यांनी गणपती मंदिरात केलेली कृती चुकीची असल्याचंही ते यावेळी म्हणाले. भाग्यश्री यांच्यासह अन्य दोन मुलींनाही कुटुंबात समान मानसन्मान दिला जातो. मात्र, एकदा प्रतिष्ठापनेची पूजा झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन पूजा अथवा आरती करणे योग्य नसल्याचे विजयसिंहराजे यांनी म्हटले. दरम्यान, आपल्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही विजयसिंहराजे यांनी उत्तर दिलं. आपण आजारी असल्याच्या चर्चा होत असल्या तरी आपण तंदुरुस्त असून, अजूनही आपल्यात पुरेशी ताकद असल्याचे सांगत त्यांनी प्रकृतीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय घडलं ?
गणपती मंदिरात उत्सवमूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना सकाळच्या सुमारास अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन मंदिरात पोहोचल्या. प्रतिष्ठापनेसाठी उत्सवमूर्ती दरबार हॉलकडे नेण्यापूर्वी आरती करण्यात येणार होती. या आरतीसाठी नूतन युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, याच वेळी भाग्यश्री पटवर्धन यांनी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि आरती केली. त्यामुळे मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या व्यक्तींमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले आणि काही वेळातच या घटनेची चर्चा सुरू झाली.
या कृतीमागील आपली भूमिका स्पष्ट करताना भाग्यश्री पटवर्धन यांनी, राजेंची प्रकृती नेहमीच ठीक नसते आणि त्यामुळे आपल्या मुलांपैकी कोणीही उपस्थित राहून आरती करावी, अशी भूमिका घेतल्याचं सांगितलं होतं. तर आता विजयराजे पटवर्धन यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. मी आजारी असल्याचे बोलण्यात येत आलं पण मी तंदुरुस्त आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.