Pune News : बावधनमध्ये खड्ड्यांचा कहर; पाण्याने भरलेल्या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक
पुण्यातील बावधन परिसरात पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना जीवघेण्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातांचा धोका वाढला असून, नागरिक संतप्त आहेत. तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

‘पुणे तिथे काय उणे!’ असं मिश्कीलपणे म्हटलं जातं. मात्र सध्या पुणेकरांना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. शहरातील खराब रस्ते, मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेलं पावसाचं पाणी यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. बावधन परिसरातही याच समस्येचं गंभीर चित्र पाहायला मिळत असून, मुख्य रहदारीच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बावधन परिसरातील अनेक प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने त्यांची खोली आणि आकार वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नाही. परिणामी अनेक वाहनं या खड्ड्यांमध्ये आदळत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?
बावधनमधील काही रस्त्यांवर घोट्यापर्यंत, तर काही ठिकाणी त्याहून अधिक पाणी साचल्याचं चित्र आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. खड्डा चुकवताना वाहनाचा तोल जाण्याची शक्यता असते, तर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागत असल्याने मागून येणाऱ्या वाहनांशी अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. या परिस्थितीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. रस्त्यांची अवस्था पाहता ‘रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता?’ असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांची नाराजी
खड्डे, साचलेलं पाणी आणि खराब रस्त्यांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढली आहे. रस्त्यांची वेळेवर दुरुस्ती का केली जात नाही? तसेच पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य जलनिस्सारण व्यवस्था का करण्यात आलेली नाही? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका (PMC) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) संबंधित भागांची तातडीने पाहणी करून खड्ड्यांची दुरुस्ती, पाणी साचणाऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था आणि आवश्यक वाहतूक नियोजन करावं, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, रोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार आणि कारचालकांसाठी हा रस्ता सध्या मोठं आव्हान ठरत असून, पावसाळ्यातील या ‘खड्डेमय’ प्रवासातून नागरिकांची कधी सुटका होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.