Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर लोकशाहीविरोधी असून, या बंदमध्ये सर्व विरोधी पक्ष आणि नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, पण वाहतुकीत अडथळे येऊ शकतात.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक
वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक
| Updated on: Jul 23, 2026 | 9:19 AM

नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या महिन्याभरापसून आंदोलन सुरू आहे. आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्तेय सोनम वांगचुक यांना सरकारने बळजबरीने उचलून रुग्णालयात दाखल केल्यावर, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि अनेक आंदोलनकर्ते पुढे सरसावले आणि त्यांनी उपोषण सुरू केलं. मात्र या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जमुळे संतापाच वातावरण असून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे पदसाद महाराष्ट्रातही उमटले असून याच लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (23 जुलै) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. नीट (NEET) परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं होतं. या महाराष्ट्र बंदमध्ये विरोधी पक्षांनी देखील सामील व्हावे असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

शांततापूर्ण मार्गाने आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचं आंबेजकर म्हणाले होते. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात येत असून, या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या आंदोलनात राज्यातील सर्व विरोधी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केलं.

प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदवर सविस्तर भाष्य करत, या महाराष्ट्र बंदचे नियोजन कसे आहे? तसेच या बंदला कोणी-कोणी पाठिंबा दर्शवला, याची माहिती दिली.  विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार एवढं घाबरलं आहे की आता केंद्र सरकारने टेरीटोरीयल आर्मी तैनात केली आहे. आमच्या बंदला डाव्या पक्षांनी पाठिबा दिला आहे. शिक्षण संस्थांनीही आमच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे, तसेच राज्यातील कोचिंग क्लासेसही आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती आंबेडकर यांनी काल दिली होती. आम्ही भाजप सोडून सर्व पक्षांना महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. या बंदमध्ये प्रत्येकानेच सहभागावी व्हावं, आपण विद्यार्थ्यांसोबत आहोत, हे दाखवून दिलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वंचितच्या साडेतीन हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं 

आज दिलेल्या बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.  ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अत्याचार होतोय, लाठीचार्ज होतोय, पेपर फुटण्यावर कारवाई होत नाहीये. हा जो नाकर्तेपणा आहे तो लोकांसमोर आला पाहिजे आणि शासनाने ॲक्शन घेतली पाहिजे, त्यासाठी हा महाराष्ट्र बंद पुकारला आहे. सामान्य जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सकाळी जी माहिती हाती आली, तोपर्यंत साडेतीन हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं, असा दावाही त्यांनी केला.  तसेच RSS च्या एका गटाकडून संघर्ष व्हावा यादृष्टीने प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.  वंचितच्या कार्यकर्त्यांना शांततेत बंद पाळण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं.

काय राहणार सुरू, काय बंद ?

या ‘बंद’ला पाठिंबा म्हणून काही भागांमधील दुकाने आणि बाजारपेठा स्वेच्छेने बंद राहू शकतात. तथापि, अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. उपलब्ध माहितीनुसार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू राहण्याची शक्यता आहे; तरीही, निदर्शने झाल्यास प्रवाशांना वाहतूक कोंडी किंवा रस्ते रोखले जाण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Follow Us