‘गुंगी गुडिया’वरून काँग्रेसमध्ये मतभेद? पृथ्वीराज चव्हाण यांचा पक्षाला घरचा आहेर

Sunetra Pawar : काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे.

गुंगी गुडियावरून काँग्रेसमध्ये मतभेद? पृथ्वीराज चव्हाण यांचा पक्षाला घरचा आहेर
Prithviraj Chavan on Sunetra Pawar
Image Credit source: Google
| Updated on: Aug 04, 2026 | 7:52 PM

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यावरून राज्याचे राजकारण तापले असून राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये चव्हाण यांनी नेमकं काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.

पृथ्वीराज चव्हाण यांची पोस्ट जशीच्या तशी…

दिल्लीत आज सकाळी अंजलीताई दमानिया यांचा फोन आला, त्यांनी महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या “गुंगी गुडिया” या पोस्टबद्दल आक्षेप नोंदवला. मी त्यांना माहिती घेतो असे सांगितले.

‌बीड मधील एका पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही उत्तर न देता पत्रकार परिषद गुंडाळली‌. त्या संदर्भात काँग्रेसच्या सोशल मीडियाची ती टिपणी होती, अर्थातच महिलांच्या बाबतीमध्ये असे उद्गार टाळता आले असते, मुळातच महिलांना राजकारणात नगण्य स्थान आहे, एखादी महिला जर राजकारणात सक्रिय काम करत असेल तर तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रश्न विचारायचा पत्रकारांचा अधिकार आहे आणि उत्तर न देण्याचा मंत्र्यांचा. पण त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अनुत्तरीत राहते. त्याला मुख्यमंत्री/गृहमंत्री हे संपूर्णपणे जबाबदार आहेत, त्यांनीच उत्तर दिले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांना कधीही उत्तर न देण्याची परंपरा गेली बारा वर्षे अत्यंत काळजीपूर्वक जोपासली आहे. त्यांचे महिलांच्या बद्दलचे उदगार – ‘50 करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, किंवा गुजरातच्या महिलांच्याबद्दलचे त्यांचे वक्तव्य जगजाहीर आहेत. पण काँग्रेसची वेगळी परंपरा आहे. काँग्रेसने नेहमीच देशात राजकारणाची पातळी सांभाळायचे काम केले आहे. अशा प्रकारचा शब्दप्रयोग स्वर्गीय राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींच्या बाबत केला होता. पण इंदिराजींनी त्यांना कृतीने उत्तर दिले.

सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात कार्यरत असून राज्याच्या एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणे योग्य नाही. अर्थातच त्यांच्याकडूनही कृतीने उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. या पोस्टशी माझा कोणताही संबंध नसताना माझ्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. कोणावरही आरोप करण्यापूर्वी करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us