Missing women’s : पुण्यातून 840 महिला बेपत्ता झाल्याची नोंद; काय कारणं? पोलिसांनी काय सांगितलं? वाचा…

| Updated on: Jul 28, 2022 | 7:30 AM

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. याबाबत गोर्‍हे यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती.

Missing womens : पुण्यातून 840 महिला बेपत्ता झाल्याची नोंद; काय कारणं? पोलिसांनी काय सांगितलं? वाचा...
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्यातून 840 महिला बेपत्ता (Missing womens) झाल्याची नोंद झाली आहे. 2022ची ही आकडेवारी पोलिसांनी जारी केली आहे. शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2022च्या पहिल्या सात महिन्यांत पुण्यातून बेपत्ता झालेल्या एकूण 840 महिलांपैकी सुमारे 396 महिला सापडल्या आहेत. जूनमध्ये सर्वाधिक 186 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून त्यानंतर मेमध्ये 135 महिला बेपत्ता झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्तालयाचा विचार करता, 885 महिला बेपत्ता झाल्या आहेत, तर पुणे ग्रामीण पोलिसांनी याच कालावधीत 743 महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. यातील बहुतांश महिला कौटुंबिक कलह (Family problems), नातेसंबंध किंवा नोकरीच्या संधींमुळे घर सोडतात आणि अनेकजण आपली चूक लक्षात घेऊन परततात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 16 ते 25 वर्षे वयोगटातील बहुसंख्य स्त्रिया घरगुती भांडण किंवा पालकांसोबत घरातील भांडणामुळे घर सोडतात, असे पोलिसांनी सांगितले.

मानवी तस्करीचाही भाग?

या बेपत्ता महिलांमध्ये मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या किंवा रस्त्यावर राहणाऱ्यांचाही समावेश असू शकतो. सामाजिक कार्यकर्ते मात्र या बेपत्ता केसेस मानवी तस्करीचाही भाग असू शकतो, यावर भर देतात. त्यामागे विशेष कारण नसल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाचे पोलीस निरीक्षक अण्णा माने यांनी दिली. बेपत्ता झालेल्या महिलांची ही सामूहिक संख्या असून कौटुंबिक वाद, नातेसंबंध, प्रियकराकडून लग्नाच्या बहाण्याने आमिष दाखविणे अशी अनेक कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. एकाही दुव्याकडे दुर्लक्ष होत नसून प्रत्येक मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे माने यांनी सांगितले.

‘स्वतंत्र जीवन जगायचे आहे’

पोलिसांनी असेही सांगितले, की अशा काही महिला आहेत ज्यांना स्वतंत्र जीवन जगायचे आहे आणि आपल्या जुन्या विचारांच्या किंवा पारंपरिक विचारांच्या घरातून पळून जायचे आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार महिलांचे अपहरण झाल्याची काही प्रकरणे आहेत.

हे सुद्धा वाचा

‘वाढती संख्या चिंताजनक’

महिला आणि बाल कार्यकर्त्यांच्या मते, महिला बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असली तरी मानवी तस्करीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रेमप्रकरणांमुळे किंवा कौटुंबिक वादामुळे महिला बेपत्ता झालेल्या प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे, की त्या कुटुंबातील काही सदस्य किंवा मित्राच्या संपर्कात असतात. परंतु शोध न करता येणाऱ्या महिलांची वाढती संख्या सर्वांसाठीच चिंताजनक आहे.

गोर्‍हे करताहेत दोन वर्षांपासून पाठपुरावा

शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. याबाबत गोर्‍हे यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. बलात्काराच्या घटनांमध्ये घट झाली आहे, परंतु त्याचवेळी कौटुंबिक हिंसाचारामुळे महिला हरवण्याच्या घटनांमध्ये कालांतराने वाढ झाली आहे. मात्र, या बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी पोलीस अथक परिश्रम घेत आहेत, असे त्यांनी सांगितले.

‘अनोळखी महिलांचे छायाचित्र प्रदर्शन भरवावे’

गोर्‍हे यांनी सांगितले, की पोलिसांनी मृत झालेल्या अनोळखी महिलांचे छायाचित्र प्रदर्शन भरवावे. जेणेकरून त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळू शकेल. त्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) मनोज लोहिया यांच्याशी चर्चा सुरू असून लोहिया त्याबाबत सकारात्मक असल्याचे त्या म्हणाल्या.