Asim Sarode : संविधानिकतेचा शोध सामान्य नागरिकांना घ्यावा लागेल : अ‍ॅड.असीम सरोदे

| Updated on: Apr 21, 2022 | 11:37 PM

स्वातंत्र्य, समता व बंधुता यापैकी बंधुता सगळ्यात महत्वाचा जोडणारा घटक आहे असे स्पष्टपणे मांडताना डॉ आंबेडकरांनी जातीविहिन, वर्गविहिन समाजच लोकशाही-संविधानाचा गाभा आहे असे सांगितल्याची आजही वारंवार आठवण करून द्यावी लागते. त्यामुळे आपण विकसित लोकशाही होण्यात तो अडथळा असल्याचे मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी मांडले.

Asim Sarode : संविधानिकतेचा शोध सामान्य नागरिकांना घ्यावा लागेल : अ‍ॅड.असीम सरोदे
अॅड. असिम सरोदे
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : बहुविविधता भारताची सुंदरता आहे. परंतु विशिष्ट एकारलेल्या विचारांच्या लोकांनी देशभर राजकीय उद्देशाने बहुविविधतेच्या संदर्भात कृत्रिम अस्वस्थता निर्माण केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडलेली सहिष्णुता विरुद्ध असहिष्णुता असा संघर्ष देशात निर्माण झाल्याने संविधानिकतेचा शोध सामान्य नागरिकांना घ्यावा लागेल. संविधान (Constitution) म्हणजे केवळ थेअरी नसून लोकतंत्र चालविण्याची लोकस्वीकृत योजना आहे. जातीय व धार्मिक बहुसंख्याकवादाच्या आधारे काहीही स्वीकारायचे की लोकशाही तत्वांच्या आधारे माणुसकीचा स्विकार करायचा याचा निर्णय नागरिकांनाच घ्यावा लागेल. कारण राजकारणी लोकांनी कदाचित संविधान व लोकशाही केवळ नाटकी स्वरूपात पाळायचे ठरविले आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीसारखे एक आंदोलन ‘संविधान चळवळ’ किंवा ‘कायदेशीरतेचे आंदोलन’ अशा स्वरूपात उभारले जाण्याची गरज आहे असे परखड मत संविधान विश्लेषक, जेष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनी व्यक्त केले. (Adv. Statement of Asim Sarode on the Constitution in the seminar in Pune)

आंबेडकर जयंती निमित्त ‘संविधानातील लोकशाही व अभिव्यक्ती’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे विद्यापीठाच्या सभागृहात डॉ. आंबेडकर जयंती निमित्त आयोजित ‘संविधानातील लोकशाही व अभिव्यक्ती’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी कुलगुरू नितीन कळमकर, प्र-कुलगुरू डॉ. एम. एस. उमराणी, कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार उपस्थित होते. प्रत्येकाला चिकित्सक मत मांडण्याचा, इतरांच्या मतांचे विश्लेषण करण्याचा हक्क आहे. कुणाबद्दल केवळ स्तुती करणारेच बोलावे अशी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही अशा मतस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेल्या बाबासाहेबांच्या विचारांचे ओझरते दर्शन सुद्धा सामान्य माणसांना व्हायला नको यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना पुतळ्यांमध्ये बंदिस्त करून ठेवण्याचे राजकीय षडयंत्र ओळखता आले पाहिजे असेही अ‍ॅड.असीम सरोदे म्हणाले.

संविधान म्हणजे विवेकाचे जागरण

स्वातंत्र्य, समता व बंधुता यापैकी बंधुता सगळ्यात महत्वाचा जोडणारा घटक आहे असे स्पष्टपणे मांडताना डॉ आंबेडकरांनी जातीविहिन, वर्गविहिन समाजच लोकशाही-संविधानाचा गाभा आहे असे सांगितल्याची आजही वारंवार आठवण करून द्यावी लागते. त्यामुळे आपण विकसित लोकशाही होण्यात तो अडथळा असल्याचे मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी मांडले. सुसंस्कृत व सुसंस्करीत लोकशाही आता शक्यच नाही का इतका निराशाजनक काळ काही वैचारिक सुमारता असलेल्या काही राजकीय नेत्यांनी निर्माण केला असल्याचा आरोप करून अ‍ॅड. सरोदे म्हणाले की, लोकशाही म्हणजे सहजीवन आहे व लोकशाहीचे अक्षरतत्व नैतिक मूल्यांवर आधारित आहे. संविधान म्हणजे विवेकाचे जागरण आहे. आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचे गोंगाटपूर्ण स्वरूप बदलल्याशिवाय आपण डॉ आंबेडकर नावाच्या क्रियाशील विचारवंताला मित्र म्हणून शांतपणे भेटू शकणार नाही अशी खंत सुद्धा अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केली. (Adv. Statement of Asim Sarode on the Constitution in the seminar in Pune)

इतर बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जातीवाद वाढला नाही हे जयंत पाटलांनी का सांगितलं नाही; शरद पोक्षेंचा सवाल

Ankush Shinde : पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारला