Ajit Pawar : मेहेरबानी करा, पण कुठलीही चूक होऊ देऊ नका, नाहीतर वाट लावाल आमची! विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काय म्हणाले अजित पवार?

आमची शेती आणि शेतीपूरक उद्योग या उद्योगांना किंवा समाजाला उपयोगी ठरतील, अशा नवीन संकल्पना पुढे आल्या पाहिजेत. अध्यासन कल्पनांना मूर्त स्वरूप मिळाले पाहिजे. या संकल्पनांचा उपयोग समाजाच्या व्यापक हितासाठी झाला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : मेहेरबानी करा, पण कुठलीही चूक होऊ देऊ नका, नाहीतर वाट लावाल आमची! विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काय म्हणाले अजित पवार?
बारामतीतील कार्यक्रमादरम्यान अजित पवार आणि विद्यार्थी
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 2:19 PM

बारामती, पुणे : राज्याच्या फायद्याचा विषय असेल तर सरकार नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहणार, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ते बारामतीत बोलत होते. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar), उद्योगपती गौतम अदानी, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी यावेळी फेलोशिप (Fellowship) प्राप्त विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, की तुमच्याकडून महाराष्ट्राला अपेक्षा आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन तुम्हाला केले, तुम्हाला शिकवले गेले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगळ्या पद्धतीने विचार करणारे तरूण-तरुणी पुढे आले पाहिजेत, अशी गरज अजित पवार यांनी व्यक्त केली.

‘समाजोपयोगी संकल्पना पुढे याव्या’

आमची शेती आणि शेतीपूरक उद्योग या उद्योगांना किंवा समाजाला उपयोगी ठरतील, अशा नवीन संकल्पना पुढे आल्या पाहिजेत. अध्यासन कल्पनांना मूर्त स्वरूप मिळाले पाहिजे. या संकल्पनांचा उपयोग समाजाच्या व्यापक हितासाठी झाला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे या प्रयत्नांमध्ये सातत्य राहिले पाहिजे, ही व्यवस्था कायम टिकली पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच मेहरबानी करा पण कुठलीही चूक होऊ देऊ नका, तुम्ही इकडे शिकलेले आहात, नाहीतर आमची वाट लावाल, असेही मिश्कीलपणे अजित पवार म्हणाले.

‘आजची पिढी उद्याचे मनुष्यबळ’

पुढे ते म्हणाले, की आता हे सगळे करत असताना आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया ज्यांनी रचला, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांचा गौरव होतो, ते आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने काम करत असलेल्या प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम घेतलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी झालेल्या सायन्स सेंटरच्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपली आजची पिढी हे देशाचे उद्याचे मनुष्यबळ आहे. त्यांना भविष्यकाळातील येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास तयार करायला हवे, हे करत असताना त्या आव्हानांवर मात करून संधीत रुपांतर करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

बारामतीतील कार्यक्रमादरम्यान अजित पवार