गुप्त बैठकीतला हा मुद्दा शरद पवार यांनी मान्य केला असता तर, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंपच

| Updated on: Aug 16, 2023 | 2:47 PM

अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात जी गुप्त बैठक उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी झाली, यानंतर या विषयी आणखी एक नवीन मुद्दा समोर आला आहे, जो या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर ठेवला होता, हा मुद्दा शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे, कारण हा मुद्दा शरद पवार यांनी मान्य केला असता, तर राजकारणात भूकंप झाल्यासारखंच झालं असतं.

गुप्त बैठकीतला हा मुद्दा शरद पवार यांनी मान्य केला असता तर, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंपच
Follow us on

पुणे : अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात जी गुप्त बैठक झाली, त्या बैठकीविषयी अनेक तर्क राजकीय क्षेत्रात लावले जात आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर जोपर्यंत शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत येत नाहीत, तोपर्यंत अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही, अशी अट भाजपाकडून अजित पवार यांच्यासमोर ठेवली गेली, असा दावा, वडेट्टीवार यांनी केला आहे. पण त्याही पुढे आज सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं, याचे आणखी वेगळे मुद्दे समोर आलेले आहेत.

अजित पवार आणि शरद पवार या्ंची पुण्यात बैठक झाली. या बैठकीवर शिवसेना हा राष्ट्रवादीचा मित्र पक्ष नाराज झाला असल्याचं, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिसून आलं आहे. संजय राऊत यांनी यावर म्हटलं होतं, जर आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसून चहा प्यायलो तर चालेल का?, संजय राऊत यांनी यावेळी शरद पवार हे त्यांच्यासाठी भीष्म पितामह असल्याचंही म्हटलं होतं. पण अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जी बैठक झाली, त्यात आणखी नवे मुद्दे आले आहेत, त्यावर शरद पवार आज दुपारी बोलतीलच, पण त्याआधी समजून घेऊ या. या बैठकीत नेमकं काय घडलं?

अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर गुप्त बैठकीत जे मुद्दे ठेवले आहेत, ते शरद पवार यांना पटलेले नाहीत. यानंतर शरद पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं जात आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना सांगितलं होतं की, तुम्ही तटस्थ राहा.निवृत्ती घ्या. वेगळा ग्रुप म्हणून लढू नका. कारण शिवसेनेची जी अवस्था सध्या होत आहे, ती राष्ट्रवादीची होणार नाही हे कशावरुन?, पक्ष एकसंध राखण्याची गरज आहे, कोर्ट केसेस सध्या तरी आपल्याला परवडणाऱ्या नाहीत, त्यामुळे हा सल्ला स्वीकारा, असा सल्ला अजित पवार गटाने शरद पवार यांना दिला आहे. मात्र शरद पवार यांनी अजित पवार यांचं हे म्हणणं फेटाळून लावलं आहे. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी देखील म्हटलं आहे, शरद पवार साहेबांनी आमच्यासोबत यावं, असं आम्ही त्यांना साकडं घातलं आहे.

तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार हे जर मविआसोबत भविष्यात आले नाहीत, तर आमच्या प्लान ए आणि प्लान बी मात्र तयार असणार आहे. ही भूमिका आमच्यासाठी निवडणूक लढवण्याची आणि रणनीतीची गरज आहे.दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी शिवसेनेकडून कुठे कुठे उमेदवार दिले जातील, याची चाचपणी सुरु केली आहे. दुसरीकडे पवार कन्या सुप्रिया सुळे यांनी नात्यातला ओलावा आणि राजकारणातील संबंध यांची सरमिसळ करु नका, असं माध्यमांना म्हटलं होतं, पण ही गुप्त भेट झाली नाही, असं राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटाने नाकारलेलं नाही.