तरुणांनो, तुम्ही कधीच चुका… अमित शाह तरुणांना काय म्हणाले?
पुण्यात अमित शाह यांनी युवकांना लोकमान्य टिळकांचे 'गीतारहस्य' वाचण्याचा सल्ला दिला. आयुष्यात चुका टाळण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. टिळकांनी राष्ट्र चेतना जागवण्यात बजावलेल्या भूमिकेची त्यांनी आठवण केली. अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान करताना शाह यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

गेल्या आठवड्यात जंतरमंतरवर जोरदार आंदोलन झालं. यावेळी तरुणांवर लाठीमार करण्यात आला. अनेकांची डोकी फुटली. आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागली. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर संसदेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. हे सर्व घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ व्हिडिओ शेअर करून तरुणांशी संवाद साधला. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या आंदोलनावर काहीच भाष्य केलं नाही. त्यामुळे विरोधकांनी अमित शाह यांना धारेवर धरलं. मात्र, शाह यांच्याकडून कोणतंच स्टेटमेंट आलं नाही. आज शाह पुण्यात होते. तिथेही त्यांनी या आंदोलनावर काहीच भाष्य केलं नाही. मात्र, लोकमान्य टिळकांचा संदर्भ देत तरुणांना टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ वाचण्याचा सल्ला दिला.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी भाषण करताना विद्यार्थ्यांना टिळकांच्या मार्गावर जाण्याचा सल्ला दिला. मला लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ गुजरातीत मिळाला. माझं तरुणांना आवाहन आहे. तुम्ही टिळकांची गीता वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही. मी गॅरंटी देतो. हा ग्रंथ भगवदगीतेचं व्यावहारिक स्वरूप आहे. सामान्य माणूस भगवतगीता कशी जगू शकतो. त्याचं व्यवहारीक स्वरुप त्यात आहे, असं अमित शाह म्हणाले.
इंग्रज केसरीला घाबरायचे
इंग्रज कोणत्या वृत्तपत्राला घाबरायाचे तर केसरी आणि मराठाला घाबरायचे. त्यात टिळकांचं मोठं योगदान होतं. राष्ट्राच्या चेतनेला जागवल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याला काही मूल्य नाही. राष्ट्राची चेतना जागवूनच स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं ते म्हणायचे. त्यांनी अनेक उत्सवाच्या माध्यमातून लोकांना संघटीत करण्याचं काम केलं, असं शाह म्हणाले.
मनापासून आभार
अजित डोवाल यांना पुरस्कार देण्यात आला. मी टिळक स्मारक ट्रस्टचं मनापासून आभार मानतो. अजित डोवाल यांना पुरस्कार देण्यासाठी मला बोलावलं. मला संधी दिली. पुरस्कार कामाचं कौतुक करण्याची पद्धत आहे. एखादी व्यक्ती समाजासाठी मोठं काम करतो तेव्हा तो एक व्यक्ती राहत नाही. तो खूप पुढे जातो. अशा व्यक्तींचा सन्मान होतो, तेव्हा समाजाच्या कृतज्ञ भावनेचं निर्वहन होतं. अशा व्यक्ती सारखं जगण्याची अनेकांना प्रेरणा मिळते. टिळक पुरस्कार डोवाल यांना मिळाला, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांना मोठी प्रेरणा मिळेल. याबाबत माझ्या मनात शंका नाही, असंही त्यांनी सांगितलं.