“शिवसेना-भाजपच्या 200 पेक्षा जास्त जागा विधानसभेत निवडून आणू; भाजपनं थेट राष्ट्रवादीला आव्हान दिलं

| Updated on: Mar 26, 2023 | 5:37 PM

अमित शहा यांनी कोल्हापूरात जाहीर केलं होतं. आम्ही 48 जागांसाठी लोकसभेची तयारी करतो आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा 200 पेक्षा जास्त जागा विधानसभेतही निवडून आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

शिवसेना-भाजपच्या 200 पेक्षा जास्त जागा विधानसभेत निवडून आणू; भाजपनं थेट राष्ट्रवादीला आव्हान दिलं
Follow us on

पुणे : भाजपकडून वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करून आव्हान दिले जात आहे. भाजपच्या मंत्री निर्मली सीतारमण यांनी काही दिवसापूर्वी बारामती मिशन म्हणत त्यांनी बारामती दौरा केला होता. तर आजही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देत शिंदे-फडणवीस सरकारची स्तुतीही केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांना आव्हान देत जर माझं डिपॉझिट जप्त करायचं असेल तर अजित पवार माझ्या कामठी मतदारसंघात निवडणूक लढायला येतील असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे भविष्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे जोरदार युद्ध रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना महाविकास आघाडीच्या सरकारवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

शिंदे- फडणवीस हे फक्त घोषणावीर नाहीत

अजित पवार आणि त्यांच्या सरकारने जे काही दिलं नाही ते सगळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे फक्त घोषणावीर नाहीत.

2024 मध्ये आम्ही जिंकू 

तर राज्यातील जनतेची त्यांनी कामं केली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे 2024 मध्ये सगळ्या पक्षांना कळणार आहे की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

शिवसेनेचा विचार बदलवून टाकला

यावेळी त्यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांच्या शिवसेनेचा विचार बदलवून टाकला असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारला असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.

मतांसाठी हिंदुत्व सोडले

मतांसाठी ते हिंदुत्व सोडून हे राजकारण करत आहेत.मात्र यामुळेच त्यांना ही सगळी माणसं सोडून गेल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या गुणांमुळे त्यांचे आता पतन झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी त्यांना दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

राऊत सातत्याने शिवराळ भाषा वापरतात

संजय राऊत सातत्याने शिवराळ भाषा वापरतात ती भाषा महाराष्ट्राला आवडत नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाची धास्ती नसल्याचे सांगत जेव्हा आम्ही वेगवेगळे 2014 मध्ये लढलो होतो त्यावेळी 124 जागा निवडूण आणल्या होत्या.त्यामुळे आता निवडणुकीला अजून वेळ आहे.

मात्र अमित शहा यांनी कोल्हापूरात जाहीर केलं होतं. आम्ही 48 जागांसाठी लोकसभेची तयारी करतो आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा 200 पेक्षा जास्त जागा विधानसभेतही निवडून आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.