विराट-रोहित वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणार की नाही? कर्णधार गिलने सगळं स्पष्ट केलं
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना एजबेस्टनमध्ये होत आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार शुबमन गिल पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भविष्याबाबत स्पष्ट काय ते सांगून टाकलं.

भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार असलेल्या शुबमन गिलने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भविष्यात मोठं विधान केलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या मनातला संभ्रम दूर झाला आहे. कारण हे दोन्ही खेळाडू फक्त वनडे क्रिकेट खेळतात आणि पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 रोजी वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही दिग्गज खेळाडू वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडतो. कारण बीसीसीआयने या दोघांबाबत काहीच स्पष्ट असं सांगितलेलं नाही. त्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना 14 जुलैला खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी शुबमन गिल पत्रकार परिषदेला सामोरं गेला. या पत्रकार परिषदेत त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत स्पष्ट काय ते सांगून टाकलं. गिलच्या म्हणण्यांनुसार, दोन्ही दिग्गज खेळाडू भारताच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या योजनेत आहेत.
काय म्हणाला शुबमन गिल?
भारताचा कर्णधार शुबमन गिलने पत्रकार परिषदेत सांगितलं की, “विराट आणि रोहित गेल्या दशकापासून भारताच्या फलंदाजीचा कणा राहिले आहेत. ते आमच्या संघाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचा अनुभव आणि ते संघात आणत असलेली कौशल्ये अमूल्य आहेत. गेल्या 10 वर्षांत वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या सामन्यांमध्ये, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी काय कामगिरी केली आहे, हे आपण पाहिले आहे.” त्यानंतर शुबमन गिलने 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेबाबत संघाच्या रचनेवर सांगितलं.
भारताचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, “मला वाटते की दबावाच्या परिस्थितीत अनुभव खूप उपयुक्त ठरतो. तुम्ही अशा परिस्थितीत वारंवार आलेले असता, तुम्ही चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी केलेल्या असतात. संघाला आपल्या प्रस्थापित खेळाडूंच्या गटात बदल करायचा नाही, पण तरीही तरुण खेळाडूंना संधी द्यायची आहे. मला वाटत नाही की हा संघ अस्थिर आहे, पण आम्ही तरुण खेळाडूंना संधी देऊ इच्छितो जेणेकरून त्यांना अनुभव मिळेल.”
बुमराहबाबत काय म्हणाला गिल?
शुबमन गिल बुमराहबाबत म्हणाला की, “बुमराह काही काळानंतर संघात परत येत आहे. आशा आहे की या एकदिवसीय मालिकेपूर्वी त्याने पुरेशी गोलंदाजी केली असेल. आशा आहे की ही मालिका त्याच्यासाठी चांगली ठरेल आणि आम्ही ती विजयाने संपवू.”
