ठेकेदार कोण हे पाहू नका, रस्ता खराब असेल, तर…, अजित पवार यांनी दिला दम

| Updated on: Oct 21, 2022 | 7:59 PM

नुकसानग्रस्तांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असं आश्वासन अजित पवार यांनी दिली.

ठेकेदार कोण हे पाहू नका, रस्ता खराब असेल, तर..., अजित पवार यांनी दिला दम
अजित पवार यांनी दिला दम
Image Credit source: tv 9
Follow us on

बारामती : बारामती येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाचं उद्घाटन आज करण्यात आलं. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, तब्येत म्हणावी अशी नाही. सगळ्यांनी उत्तम प्रकारचा व्यवसाय करावा. सूतगिरणी म्हणावी अशी चालवता आली नाही. तो आपल्याला डाग आहे. आपण प्रयत्न केले मात्र यश आले नाही. राज्यात अनेक सूतगिरण्या बंद पडल्या. अनेकांना दुसरे युनीट बारामतीत सुरु करण्याबाबत विनंती केली. मात्र नकार मिळाला. नवीन मुलांना योग्य वाटेल, असे उद्योग सुरु केले पाहिजेत. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना प्रोत्साहन देण्याचा मला आनंद वाटतो.

दोन वर्षांच्या कोरोनानंतर आपण विविध सण साजरे करतोय. पण, पावसामुळे अडचण झालीय. सरासरीच्या तिपटीपर्यंत पाऊस झालाय. खरिपाचं नुकसान झालं. आता रब्बीचंही नुकसान होतेय. नद्यांना अमाप पाणी आहे. शेती आणि घरांचं नुकसान झालंय. संकटातून मार्ग काढत पुढं गेलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

समाजातील सर्व घटकांसह सीमेवरील सैन्यांसाठी दिवाळीचा आनंद पोहोचवावा. ग्राहकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यापारी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कुणी उधार मागितलं अन् त्याने पैसे नाही दिले तर धंदा बसेल. आज रोख उद्या उधारचा बोर्ड लावा. कुणी मागितलं तर त्याला बोर्ड दाखवा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

नुकसानग्रस्तांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असं आश्वासन अजित पवार यांनी दिली. रस्त्यांच्या दर्जाबाबत अनेकांची पत्र आलीत. स्थानिक पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी कामाबद्दल दक्षता घेतली पाहिजे. ठेकेदार कोण हे पाहू नका. दर्जा खराब असेल तर काळ्या यादीत टाका, असा दमही त्यांनी दिला.

रस्त्यांची कामे होताना शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. फार टोकराटोकरी करु नका. पावसामुळे अनेक अडचणी येतायत. दिवाळीपूर्वी सर्व रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण होणार होतं. पण पावसामुळे अडचण होतेय. त्यामुळे काही दिवस थांबावं लागेल. बाहेर कामांबाबत वेगवेगळं ऐकायला मिळतं. पण बारामतीत साहेब, मी कधीही वेगळं केलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.