पुणे जिल्ह्यातल्या धरणक्षेत्रात पावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण

| Updated on: Aug 23, 2021 | 2:59 PM

पुणे (Pune) शहर आणि जिल्ह्यात मागच्या काही दिवसांमध्ये पावसाने (Pune Rain) दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रमुख धरणक्षेत्रांमध्ये पाण्याच्या पातळीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही.

पुणे जिल्ह्यातल्या धरणक्षेत्रात पावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण
कुकडी प्रकल्प
Follow us on

पुणे : पुणे (Pune) शहर आणि जिल्ह्यात मागच्या काही दिवसांमध्ये पावसाने (Pune Rain) दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रमुख धरणक्षेत्रांमध्ये पाण्याच्या पातळीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. गेले दोन आठवडे जिल्ह्यातल्या प्रमुख धरणक्षेत्रामध्ये पाण्याची पातळी जैसे थे आहे. विशेतः ऑगस्ट महिना संपत आला तरी महत्वाच्या धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठी जमा झालेला नाही. (Farmers are worried as there is no rain in the dam area of ​​Pune district)

शेतकरी चिंताग्रस्त

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यातल्या काही भागासह अहमदनगर च्या काही तालुक्यांमध्ये शेतीसाठी कुकडी प्रकल्पातलं आवर्तन उपयुक्त असतं. कुकडीच्या पाण्यावर याभागातले शेतकरी विविध पिकं घेत असतात. मात्र, ऑगस्ट महिना संपत आला तरी कुकडी धरणात निम्म्याच्या थोडा जास्त म्हणजे 56 टक्के पाणीसाठा आहे. त्यात समाधानकारक पाऊस न पडल्यानं शेतकरी काहीसा चिंताग्रस्त असल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि पाण्याचं नियोजन करताना अडचणी येत आहेत. पाऊस असाच गायब राहिला तर येणाऱ्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना समोरं जावं लागू शकतं.

खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा

खडकवासला प्रकल्पाच्या मुठा खोऱ्यात 95.11 टक्के म्हणजेच 27.96 टीएमसी पाणीसाठा सध्या आहे. पुणे शहर आणि हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांसाठी खडकवासला धरण महत्वाचं आहे. खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने या भागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या 26 पैकी 11 धरणं शंभर टक्के भरली आहेत. इतर धरणांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे.

‘उजनी’तली आवक मंदावली

पावसाने ओढ दिल्याने भीमा नदीतून उजनी धरणात सोडण्यात येणारा विसर्ग दोन आठवड्यांपासून मंदावला आहे. पुण्यासह सोलापूर, अहमदनगरच्या काही भागांसाठी उपयुक्त असलेल्या उजनी धरणात रविवारी सकाळी 62.36 टक्के म्हणजे 33.41 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होणार

1 जून ते 22 ऑगस्टदरम्यान राज्यात सरासरी 752.9 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. सोमवार ते गुरूवारदरम्यान राज्याच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये राज्यातल्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Pune Weather | पुण्यात पावसाने मारली दडी, आतापर्यंत पावसाची सरासरीही नाही, काय आहे कारण?

आनंदाची बातमी! पाच वर्षांमध्ये पुण्यातील झाडांची संख्या 8.5 लाखांनी वाढली

आपण निसर्गाशी खेळ केला म्हणूनच बिबट्या, मगरींचा शहरात संचार; जयंत पाटलांनी दिला सावधानतेचा इशारा