दोन प्रभाग कधीच मागितले नाही, तीन प्रभागांचा फायदा कुणाला होतो ते पाहू; अजित पवारांचं सूचक विधान

| Updated on: Oct 01, 2021 | 2:14 PM

दोन प्रभाग पद्धतीची मागणी मी कधीच केली नव्हती. आता आम्ही तीन प्रभाग फायनल केले आहेत आणि हा निर्णय कायम राहणार आहे. (i never demand two member ward in local self election, says ajit pawar)

दोन प्रभाग कधीच मागितले नाही, तीन प्रभागांचा फायदा कुणाला होतो ते पाहू; अजित पवारांचं सूचक विधान
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us on

पुणे: दोन प्रभाग पद्धतीची मागणी मी कधीच केली नव्हती. आता आम्ही तीन प्रभाग फायनल केले आहेत आणि हा निर्णय कायम राहणार आहे, असं सांगतानाच तीन प्रभागांचा फायदा नक्की कुणाला होतो ते पाहू, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. तीनचा प्रभाग हे फायनल आहे. मी कधीच दोनचा प्रभाग मागितला नाही. तीन प्रभागांचा नेमका कोणाला फायदा होतो ते पाहू, असं अजितदादा म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहूनच घेतला जावा असं माझं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

75 तास लसीकरण मोहीम राबवणार

पुण्यात तीन दिवस लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 75 तास लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे. सीएसआरमधून 5 लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत. पुणे शहरात एक लाख सिरींज घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातही सिरींज देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. पुणे महापालिकेत कोरोनाबाधितांचा रेट 2.1 टक्के आहे. मागच्यावेळीपेक्षा परिस्थिती सुधारली आहे. मृत्युदर 2.1 वर आला आहे. पिंपरीचा मृत्युदर थोडासा वाढला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या आठवड्यात 5 लाख लोकांचे लसीकरण

पुण्यात मागील आठवड्यात 5 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. दुसऱ्या डोस घेतल्यानंतर नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधित वाढत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे, असं सांगतानाच पुण्यातील सक्रिय रुग्णांमध्ये 19 टक्के घट झाली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नगरमध्ये गावबंदी करायची असेल तरी करा, असं सांगतानाच नगरमध्ये रुग्ण नेमके कुठले आहेत ते तपासण्याचे आदेशही पवार यांनी दिले.

प्रभाग रचनेत बदल का?

दरम्यान, आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती. ऐन वेळेवर सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते, असं राजकीय पक्षांचं मत होतं. दरम्यान, शहरांचा विस्तार वाढल्यानं सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते. असं झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभार रचना केली जाण्याची शक्यता असते.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.

राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत. त्यातून प्रभाग पद्धतीवरुन या तिनही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचं दिसत होतं. त्यामुळे अंतिम निर्णय होत नव्हता. पण ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज अखेर मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या:

पंकजा म्हणाल्या, जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, धनंजय मुंडे म्हणतात, तुम्ही तर अमेरिकेत गायब होता

आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत, निर्लज्जांना आम्ही शिवसेनेत घेत नाही; राऊतांचा दलबदलूंना टोला

वर्षातून एकदा मोफत आरोग्य चाचणी, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम: योजना, धनंजय मुंडेंकडून घोषणा

(i never demand two member ward in local self election, says ajit pawar)