अतिशय निगरगट्ट! फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही भीमराव कांबळे… न्यायाधीशांचं विधान ऐकल्यावर काय घडलं?
नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट पाहायला मिळाली. आता या प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण जेव्हा कोर्टाने शिक्षा सुनावल तेव्हा 63 वर्षीय भीमराव कांबळे यांची प्रतिक्रिया कशी होती?

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्येच्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. २६ जून रोजी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले होते. त्यावेळी निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशी (Death Sentence) अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. पण जेव्हा कोर्टाच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा भीमराव कांबळे यांची प्रतिक्रिया कशी होती? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप झाला का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.
न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या प्रकरणाला ‘रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट’ (सगळ्यात दुर्मिळातील दुर्मिळ) प्रकरण म्हटले. निकालात त्यांनी म्हटले की, आरोपीच्या कृत्यांमध्ये अत्यंत निर्दयीपणा दिसून येतो. तीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर केलेला हा अत्याचार अक्षम्य आहे. आरोपीला गुन्ह्याचा पश्चाताप झालेला दिसत नाही. त्याच्यावर दया दाखवण्यासारखे कोणतेही कारण नाही. सबळ पुरावे आरोपीविरुद्ध असल्याने त्याला मृत्यूदंड देणे अपरिहार्य आहे. न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले की, “फाशीची शिक्षाही या गुन्ह्यासाठी अपुरी आहे, पण यापेक्षा मोठी शिक्षा कायद्यात उपलब्ध नाही.”
कशी होती भीमराव कांबळे यांची प्रतिक्रिया?
निकाल वाचून झाल्यानंतर न्यायाधीश साळुंखे यांनी आरोपी भीमराव कांबळेला उद्देशून म्हटले, “आता फासावर चढा.” निकालाच्या वेळी आरोपी कांबळे पूर्णपणे शांत होता. त्याने कोणताही भावनिक प्रतिसाद दिला नाही आणि खाली मान घालून उभा राहिला.
पीडितेच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
निकाल ऐकताच पीडित बालिकेच्या आई-वडिलांचे अश्रू अनावर झाले. ते बराच वेळ कोर्टात रडत होते. मुलीला न्याय मिळावा म्हणून कुटुंबीय पहिल्या दिवसापासून सातत्याने प्रयत्न करत होते. राज्यभरात झालेल्या आंदोलनांमध्येही ते सक्रिय सहभागी होते. आज अखेर न्याय मिळाल्याने त्यांच्या भावना उचंबळून आल्या.
निकालाची वैशिष्ट्ये :
-न्यायालयाने १३७ पानांचे निकालपत्र दिले आहे.
-यात ‘बचन सिंह’, ‘अशरफ अली’ आणि ‘वसंत धुपारे विरुद्ध महाराष्ट्र सरकार’ आदी महत्त्वाच्या केसेसचा संदर्भ दिला आहे.
-कोर्टाने नसरापूर प्रकरणात लोकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे नमूद केले.
-आरोपी समाजात वावरण्याच्या लायकीचा नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
२६ जूनच्या सुनावणीत आरोपीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने “मुलीला घेऊन जाताना घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाला,” असा दावा केला होता. मात्र कोर्टाने सर्व परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेत त्याचा दावा फेटाळून लावला.