बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवणारच, कोल्हापूरच्या शिवसैनिकांचं बेळगावकडे कूच

| Updated on: Jan 21, 2021 | 9:32 AM

बेळगावमध्ये जाऊन आम्ही भगवा ध्वज फडकावणारच अशी गर्जना करुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावकडे मार्गक्रमण केलं आहे.

बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवणारच, कोल्हापूरच्या शिवसैनिकांचं बेळगावकडे कूच
Follow us on

कोल्हापूर : सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी करत बेळगावमध्ये जाऊन आम्ही भगवा ध्वज फडकावणारच अशी गर्जना करुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावकडे मार्गक्रमण केलं आहे. (Kolhapur Shivsainik Goes belgaum Over yellow Saffron Flag mahapalika)

बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज बेकायदेशीररित्या लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा आयोजित केला होता. मात्र या मोर्चाला बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर ठरल्याप्रमाणे तमाम शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. आम्ही जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भगवा फडकवणारच, असा निर्धार शिवसेनेने केला आहे.

शिनोळी या गावातून भगवा झेंडा घेऊन शिवसैनिकांनी बेळगावकडे मार्गक्रमण केलं आहे. मात्र शिवसैनिकांना कर्नाटक पोलीस परवानगी देणार का?, असा मोठा प्रश्न आहे. कारण मागील काही आंदोलने, मोर्चे पाहता मराठी भाषिकांना तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांविरोधात कर्नाटक पोलिस दडपशाही करत आलेलं आहे.

चंदगड तालुक्यातील शिनोळी गावापासून शिवसेनेचे आंदोलन सुरु होणार आहे. दुपारच्या दुपारी 12 च्या सुमारास शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु त्याअगोदर कर्नाटक पोलिस सतर्क झाले आहेत.

बेळगाव प्रश्नावर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून उपाययोजना कराव्यात

बेळगाव प्रश्नावर न्यायालयाचा अंतिम निर्णय येऊपर्यंत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून काही उपाययोजना कराव्यात. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा करावी, असं मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दोन दिवसांपूर्वी राऊत बेळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातही कानडी लोक राहतात. तरीही महाराष्ट्राने नेहमी त्यांना मदतच केली आहे. मात्र, बेळगावमध्ये मराठी नाटकांवर अधिक कर लादण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

बेळगवाच्या जनतेने 70 वर्षे फार संघर्ष केला. प्रसंगी हौतात्म्य पत्करलं. पोलीस केसेस झाल्या, डोकी फुटली. त्यामुळे आता या प्रश्नावर उद्धव ठाकरे येडियुरप्पांशी चर्चा करतील. या प्रश्नावर सध्या तातडीने एक बैठक होऊन काहीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे. तरच या भागातील मराठी भाषिक जनता सूटकेचा श्वास सोडेल. विशेषत: मराठी भाषा, संस्कृती, साहित्य या संदर्भातील ही लढाई आहे. हे टिकायला हवं आणि ते टिकेल असं मला वाटतं. कारण देशभरात आणि जगभरात मराठी भाषिक लोक राहतात. राजकारणाच्या दृष्टीने देखील त्यागोष्टी महत्त्वाच्या असतात, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

(Kolhapur Shivsainik Goes belgaum Over yellow Saffron Flag mahapalika)

हे ही वाचा

बेळगाव सीमाप्रश्नावर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि येडीयुरप्पांची शिखर परिषद व्हावी : संजय राऊत