Monsoon Update : केरळनंतर मान्सून आज कुठे पोहचणार, राज्यात कधीपर्यंत बरसणार

| Updated on: Jun 09, 2023 | 10:16 AM

Monsoon and cyclone : बिपोरजॉय चक्रीवादळाने रोखून धरलेला मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनची प्रगती वेगाने होत आहे. शुक्रवारी संपूर्ण केरळसह दुसऱ्या राज्यांकडे मान्सूनची वाटचाल होणार आहे.

Monsoon Update : केरळनंतर मान्सून आज कुठे पोहचणार, राज्यात कधीपर्यंत बरसणार
Follow us on

पुणे : नैऋत्य मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून केरळमध्ये साधारणपणे १ जूनपर्यंत पोहोचतो. पण यावेळी तो ८ जूनला दाखल झाला. मान्सूनला सात दिवसांचा विलंब झाला आहे. परंतु आता केरळमध्ये दोन दिवसांत चांगला पाऊस झाला आहे. दक्षिण तामिळनाडूतही अशीच परिस्थिती आहे. मान्सूनने आपली वाटचाल पुढे सुरु केली आहे. केरळनंतर आठ दिवसांत मान्सूनचे कोकणात आगमन होण्याची शक्यता आहे. मान्सूनची प्रगती किती वेगाने होते, त्यावर राज्यात दाखल होण्याची तारीख समजणार आहे.

मान्सूनची प्रगती कशी

हे सुद्धा वाचा

पुढील ४८ तासांत मान्सून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकणार आहे. याशिवाय केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकपर्यंत मान्सून दाखल होणार आहे. तसेच ईशान्येकडील राज्यांनाही मान्सून कव्हर करणार आहे. पुढील 48 तासात मान्सूनची प्रगती वेगाने होणार आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ अरबी समुद्रात हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. आता हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर ते उत्तर-पश्चिमेकडे परत येईल.

मान्सून तिसऱ्यांदा ७ जून रोजी केरळमध्ये

मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्याची ७ जून ही आवडती तारीख दिसत आहे. तिसऱ्यांदा मान्सून याच तारखेला केरळमध्ये दाखल होत आहे. यापूर्वी 2016 आणि 2019 मध्ये मान्सून केरळमध्ये याच तारखेला दाखल झाला होता. यासंदर्भात ट्विट हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी केले आहे.

मुंबईतील मान्सूनचे आगमन लांबणीवर

मुंबईत मान्सून ११ जूनपर्यंत दाखल होतो. मात्र केरळातच मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने मुंबईतील आगमनावर परिणाम होणार आहे. मात्र हे आगमन आता जास्त लांबणीवरही पडणार नाही, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मान्सूनने आता संपूर्ण केरळ व्यापले आहे. त्यानंतर त्याचा प्रवास कर्नाटक आणि गोवा मार्ग मुंबईत होणार आहे. मात्र मान्सूनची गती किती असेल यावर मुंबईत कधी मान्सून दाखल होईल, हे समजणार आहे.

नागपुरात वातावरण निर्मिती

केरळमध्ये मान्सून दाखल होताच नागपुरात वातावरण निर्मितीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच नागपुरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून विदर्भवासीयांना काहीसा दिलासा मिळत असला तरी उकाडा मात्र कायम आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणता पंधरा दिवसात तो विदर्भात दाखल होत असतो, मात्र यावेळी आधीच उशिराने आलेला मान्सून विदर्भात केव्हा दाखल होईल, याची घोषणा अजून हवामान विभागाकडून झाली नाही. परंतु सध्या मान्सूनची चाहूल असल्याचे चित्र विदर्भात पाहायला मिळत असून मान्सूनची प्रतीक्षा विदर्भवासी करीत आहेत.