राज ठाकरेंचं ‘मिशन पुणे’, ग्रामपंचायतसाठी कंबर कसली, दोन दिवस पुण्यात तळ

| Updated on: Jan 15, 2021 | 7:53 PM

काही दिवसांपूर्वी झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेला फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. | MNS chief Raj Thackeray

राज ठाकरेंचं मिशन पुणे, ग्रामपंचायतसाठी कंबर कसली, दोन दिवस पुण्यात तळ
Raj Thackeray. (File Photo: IANS)
Follow us on

पुणे: मनसेच्या कार्यकर्त्यांना राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) स्वत:ही सक्रिय झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या (Gram Panchyat Election) मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे शनिवारी संध्याकाळी पुण्यात दाखल होत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती निश्चित करणार असल्याचे समजते. (Raj Thackeray on Mission Pune for gram panchayat election in Maharashtra)

प्राथमिक माहितीनुसार राज ठाकरे साधारण सहाच्या सुमारास पुण्यात दाखल होतील. ते दोन दिवस पुण्यात मुक्काम करणार आहेत. मनसेकडून पुण्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तालुका पातळीवर मनसे नेत्यांच्या आढावा बैठका सुरु आहेत. आतापर्यंत इंदापूर, दौंड, मुळशी, शिरूर तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. या सगळ्याचा अहवाल आता राज ठाकरे यांच्यासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनसेकडून ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती निश्चित केली जाईल.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेला फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे निवडणूक लढवल्याने महाविकासआघाडीला फायदा झाला होता. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होणार का, हे पाहावे लागेल.

पुण्यात मनसे स्वबळावर लढणार

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे ‘मनसे’कडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. जिकडे पॅनलमध्ये संधी मिळणार नाही तिकडे मनसे स्वतःचा पॅनल तयार करेल. येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

15 जानेवारीला मतदान

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते.

परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

नाशिक महापालिकेत कमबॅक करण्यासाठी मनसे सज्ज!, नवीन वर्षात राज ठाकरेंचा नाशिक दौरा

मनसेने शड्डू ठोकला, 4134 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणार

(Raj Thackeray on Mission Pune for gram panchayat election in Maharashtra)