MNS Yogesh Khaire : आज फक्त टोमणे नकोत तर ‘या’ प्रश्नांची उत्तरही मिळावी; मनसेच्या योगेश खैरेंची पुण्यात शिवसेनेवर टीका

औरंगाबादेत विविध समस्या आहेत. त्यावर शिवसेना बोलत नसल्याचा आरोप योगेश खैरे यांनी केला आहे. आता आजच्या सभेत मुख्यमंत्री मनसेने विचारले म्हणून नाही, तर औरंगाबादच्या जनतेच्या समस्या या अर्थाने तरी याची उत्तरे देणार का, याची उत्सुकता आहे.

MNS Yogesh Khaire : आज फक्त टोमणे नकोत तर या प्रश्नांची उत्तरही मिळावी; मनसेच्या योगेश खैरेंची पुण्यात शिवसेनेवर टीका
शिवसेनेवर टीका करताना मनसे नेते योगेश खैरे
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 08, 2022 | 11:13 AM

पुणे : आज फक्त टोमणे नकोत तर प्रश्नांची पण उत्तरे मिळावीत, अशी टीका मनसे प्रवक्ते योगेश खैरे (MNS Yogesh Khaire) यांनी शिवसेनेवर केली आहे. ते पुण्यात बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे आज जाहीर सभा आहे. या सभेनिमित्त शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्सवर विरोधकांना टोमणे लगावण्यात आले आहेत. यावरूनच मनसेने शिवसेनेला (Shivsena) लक्ष्य केले आहे. अशाप्रकारच्या बॅनरबाजीऐवजी जे प्रश्न प्रलंबित आहेत, ज्यांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे, त्यावर शिवसेनेने अद्याप काहीही भूमिका जाहीर केलेली नाही. महाराष्ट्राला काही प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. ही उत्तरे शिवसेना कधी देणार आहे, असा सवाल योगेश खैरे यांनी यानिमित्ताने शिवसेना आणि उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना विचारला आहे.

काय म्हटले आहेत योगेश खैरे?

औरंगाबादमध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत टोमणे तर मारले जाणारच आहेत. मात्र महाराष्ट्राला काही प्रश्न पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. त्यांनी शिवसेनेला तीन प्रश्न विचारले आहेत.

1. आज औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे अधिकृतपणे जाहीर होणार आहे का? हे नामकरण जाहीर करणार का नाही? या विषयाची नक्की सद्यस्थिती काय आहे?

2. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण थांबवले जाणार का?

3. संभाजीनगरच्या जनतेची पाण्यासाठी होणारी दुर्दशा थांबवण्यासाठी काय करणार?

असे तीन प्रश्न योगेश खैरे यांनी शिवसेनेला विचारले आहेत. औरंगाबादेत विविध समस्या आहेत. त्यावर शिवसेना बोलत नसल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. आता आजच्या सभेत मुख्यमंत्री मनसेने विचारले म्हणून नाही, तर औरंगाबादच्या जनतेच्या समस्या या अर्थाने तरी याची उत्तरे देणार का, याची उत्सुकता आहे.

संध्याकाळी सहावाजता होणार सभा

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी आणि जाहिरातबाजी करण्यात आली. या सभेसाठी शिवसेना नेते औरंगाबादमध्ये ठाण मांडून आहेत. तर मुख्यमंत्र्यांची सभा रेकॉर्डब्रेक होणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्टेजच्या एका बाजूला ठेवण्यात आला आहे. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे भाजपा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.