Rajya Sabha Election Results 2022 : काहींना ईडीची भीती दाखवली तर काहींना वेगळी ताकद दाखवून मतपरिवर्तन केलं, रोहित पवारांचा भाजपावर आरोप

| Updated on: Jun 11, 2022 | 4:41 PM

सगळे अपक्ष आपल्या बरोबर राहिले नाहीत, असे नाही. अपेक्षित आकडा पाहिजे होता, तिथे कमी पडलो. या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मात्र यामध्ये काही राहिले तर काही आपल्यापासून दूर गेले याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे रोहित पवार म्हणाले.

Rajya Sabha Election Results 2022 : काहींना ईडीची भीती दाखवली तर काहींना वेगळी ताकद दाखवून मतपरिवर्तन केलं, रोहित पवारांचा भाजपावर आरोप
रोहित पवार (संपादित छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : काही लोकांना ईडीची भिती दाखविली, काही लोकांना वेगळी ताकद देवून मत परिवर्तन केले, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपावर केला आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की संजय पवार यांना (Sanjay Pawar) पहिल्या नंबरची मत होती. जी आकडेवारी पाहिजे होती, त्या आकडेवारीमध्ये कमतरता आली. पक्षाचे सर्व आमदार होते, ते मनापासून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पाठीमागे उभे राहिले. काही अपक्षांनी ताकद दिली. मात्र इतर अपक्ष आणि इतर पक्षाने सोबत राहायला पाहिजे होते, ते राहिले नाहीत, अशी खंत आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

‘त्यांनी येणे टाळायला हवे होते’

सगळे अपक्ष आपल्या बरोबर राहिले नाहीत, असे नाही. अपेक्षित आकडा पाहिजे होता, तिथे कमी पडलो. या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मात्र यामध्ये काही राहिले तर काही आपल्यापासून दूर गेले याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजपाचे दोन आमदार आजारी असतानाही त्यांना बोलावले गेले. त्यांना त्रास होता, त्यामुळे त्यांनी येणे टाळायला हवे होते. त्यांची प्रकृती लवकर चांगली व्हावी, ते लवकर बरे व्हावेत अशी आशा रोहित पवारांनी व्यक्त केली. याविषयी त्यांनी ट्विटही केले होते.

हे सुद्धा वाचा

‘आमदार नाराज असणे आणि विकास याचा संबंध नाही’

काही आमदार नाराज होते. आपल्या मतदारसंघाला निधी मिळत नाही. त्यामुळे विकासकामे होत नाहीत, अशी ओरड काही आमदारांची होती. विशेषत: अपक्षांची. त्यावर ते म्हणाले, की आमदार नाराज असणे आणि विकास याचे कोणतेही नाते नाही. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांना जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. दिलीप मोहिते यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र नाराजी व्यक्त केली असली तरी विचाराला दगा दिला नाही. ते महाविकास आघाडीसोबत राहिले, असे म्हणत त्यांनी मोहितेंची पाठराखण केली.