सर्वात मोठी बातमी ! महाविकास आघाडीत फूट; ‘ही’ विधानसभा, जिल्हापरिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

| Updated on: Jan 25, 2023 | 8:28 AM

राष्ट्रवादीने माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांची विधानसभेचे उमेदवार म्हणून घोषणाही केली आहे. पारगाव-मेमाणे येथे बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटाचा मेळावा पार पडला.

सर्वात मोठी बातमी ! महाविकास आघाडीत फूट; ही विधानसभा, जिल्हापरिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार
NCP
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने या दोन्ही निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकाही एकत्र लढण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. याशिवाय महाविकास आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी वंचित आघाडीलाही या आघाडीत घेण्यात येणार आहे. मात्र, या हालचाली सुरू असतानाच महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्रं आहे. पुरंदर विधानसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडीत फूट पडली आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. पुरंदर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे विधानसभेसोबतच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूकही स्वबळावर लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीला सुरुंग लागल्याचं चिन्हं दिसत आहे.

सनदी अधिकारी उमेदवार

राष्ट्रवादीने माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांची विधानसभेचे उमेदवार म्हणून घोषणाही केली आहे. पारगाव-मेमाणे येथे बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटाचा मेळावा पार पडला. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. पुरंदर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करण्याचा निर्णय घेम्यात आला आहे.

स्वबळ फायदेशीर ठरेल

आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. तो राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरेल. राष्ट्रवादीला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय तरुण वर्ग राष्ट्रवादीकडे येत आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं पुरंदर तालुका राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं.

सेना-काँग्रेस काय करणार?

राष्ट्रवादी काँग्रेसने पुरंदर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन लढणार की दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार अशी जोरदार चर्चा आहे.