ओम्या शर्यतीचा राजा गेला..७ थार, २ स्कोर्पिओ, ३ जेसीबी, ८ ट्रॅक्टरनी दुचाकी खोऱ्याने जिंकणारा भारतकेसरी !

बैल शेतात राबतो, जमीन नांगरतो, मशागत करतो आणि बळीराजाच्या कष्टाला बळ देतो. मात्र, पुणे जिल्ह्याच्या मावळमधील एका बैलाने आपल्या मालकाला केवळ साथच दिली नाही, तर अक्षरशः करोडपती केलं.

ओम्या शर्यतीचा राजा गेला..७ थार, २ स्कोर्पिओ, ३ जेसीबी, ८ ट्रॅक्टरनी दुचाकी खोऱ्याने जिंकणारा भारतकेसरी !
omya bull passed away
| Updated on: Aug 30, 2026 | 6:13 PM

शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणून बैलाकडे पाहिले जाते. आता ट्रॅक्टर जरी आले असले ज्याच्या दारी बैलजोडी तो शेतकरी खरा श्रीमंत मानल जाते. मात्र, एका बैलाने मालकाला अक्षरश: कोट्यधीश केले होते. आणि दशकभर शर्यतींचा बादशहा असलेल्या या ओम्या बैलाने पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये विक्रम केला होता. या ओम्या बैलाने मालकाला प्रत्येक शर्यत जिंकून चक्क मालामाल केले. सहा-सात थार गाड्या, दोन स्कॉर्पिओ, दोन ते तीन जेसीबी, आठ ट्रॅक्टर, अगणित दुचाकी, चांदीची गदा आणि असंख्य ट्रॉफी अशी बक्षिसांची अक्षरशः बरसात ओम्याने आपल्या मालकावर केली होती. या लाडक्या ओम्या बैलाने २७ ऑगस्ट रोजी निधन झाले आणि ओम्याचे मालक रामनाथ वारिंगे अक्षरश: दु:खात बुडाले.

शर्यत म्हणजे ‘ओम्या’!

बैलगाडा शर्यतीच्या घाटात जवळपास दशकभर आपल्या वेगाची दहशत निर्माण करणाऱ्या ओम्याचे 27 ऑगस्ट 2026 रोजी निधन झाले आणि लाडक्या बैलाच्या अचानक जाण्याने मालक रामनाथ वारंगे यांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू तरळले.

2016-17 च्या सुमारास जालना जिल्ह्यातून मैसूर जातीचा हा रुबाबदार बैल रामनाथ वारंगे यांनी विकत आणला होता. पुढे बैलगाडा शर्यतीच्या घाटाचा ‘राजा’ ठरेल, याची कल्पनाही त्यावेळी कुणाला नव्हती. 2017 पासून ओम्याने बैलगाडा शर्यतीला सुरुवात केली. त्यानंतर घाटात उतरला की पहिला नंबर म्हणजे ओम्या, असं समीकरणच बनल होते. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर तर ओम्याने अक्षरशः घाट गाजवला. हजारो बैलांच्या स्पर्धेत त्याने आपला दबदबा कायम ठेवला. तब्बल 1200 गाड्यांमधून पहिला क्रमांक पटकावण्याचा मान त्याने मिळवला.एका शर्यतीत अवघ्या 11 सेकंद 22 मिनिटांत पहिला क्रमांक मिळवल्याची कामगिरीही ओम्याच्या नावावर आहे.

पण ओम्याचं यश..

दोन स्कॉर्पिओ, सहा-सात थार गाड्या, तीन जेसीबी, आठ ट्रॅक्टर, अगणित दुचाकी, चांदीची गदा आणि असंख्य ट्रॉफी अशी बक्षिसांची अक्षरशः बरसात ओम्याने आपल्या मालकावर केली.म्हणूनच ओम्याने रामनाथ वारंगे यांना केवळ श्रीमंत केलं नाही… तर पंचक्रोशीत एक वेगळी ओळखही मिळवून दिली.ओम्याची निगा राखण्यासाठी त्याला विशेष आहार दिला जायचा. उडीद डाळ, शेंगदाण्याची पेंड, खारीक, तूप, अंडी, बदाम असा पौष्टिक आहार त्याला दिला जायचा. मालकासाठी तो फक्त शर्यतीचा बैल नव्हता..तो घरातील एक सदस्य होता.

27 ऑगस्टला नेहमीप्रमाणे ओम्याने पाणी प्यायलं… काही वेळ निवांत बसला. त्यानंतर तो शिंगाने माती उकरत होता. मात्र, अर्ध्या तासाच्या आतच परिस्थिती बदलली.ओम्या अचानक निपचित पडला.त्याची जीभ बाहेर आली होती, दात हलत होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर विषारी दंशामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं,ज्या बैलाच्या धावण्याने हजारो प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे…ज्यांच्या विजयाने मालकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलायचा..ज्याने आपल्या मालकाला करोडपती केलं…तोच ओम्या आता कायमचा शांत झाला आहे.

 

शेतकऱ्याचा मित्र म्हणून बैलाकडे पाहिले जाते.पण ओम्या आणि रामनाथ वारंगे यांचे नाते त्याही पलीकडचं होते.ओम्याने मालकासाठी शेतात राबण्यापासून ते बैलगाडा शर्यतीच्या घाटात विजय मिळवण्यापर्यंतचा प्रवास केला.त्याने बक्षिसं जिंकली…संपत्ती मिळवून दिली…नाव मिळवून दिलं. पण आज त्या सगळ्या संपत्तीपेक्षा मालकाला आठवतोय तो फक्त आपला ओम्या. ज्याच्या गळ्यात कधी विजयाच्या माळा पडायच्या..आज त्याच ओम्याला अश्रूंनी निरोप देताना मालकाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात आहे.

 

 

Follow Us