“दादा या स्वयंघोषित ‘दादा’ होणाऱ्यांचा बंदोबस्त करा”, कार्यकर्त्याची अजित पवारांना पत्रातून तक्रार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच पक्षाच्या एका कार्यकर्त्याने पत्र पाठवलं आहे. या पत्रात कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांची नाव न घेता तक्रार केली आहे. संबंधित नेते हे कशाप्रकारे दादागिरी करतात याबाबत पत्रात खुलासा केला आहे. संबंधित पत्र हे सोशल मीडियावर व्हायरलही झालं आहे. या पत्रावर अजित पवार काय भूमिका मांडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दादा या स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा, कार्यकर्त्याची अजित पवारांना पत्रातून तक्रार
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Image Credit source: Facebook
| Updated on: Jun 28, 2024 | 8:24 PM

बारामती येथील किरण लकडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट पत्र लिहीत गाऱ्हाणे मांडले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किरण लकडे यांनी अजित पवारांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, “दादा, विकासकामांची दोर हातात घेऊन आपण युतीच्या सरकारमध्ये सामील झालात, आनंद वाटला. उपमुख्यमंत्री पदही मिळालं तेव्हाही आनंद वाटला आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला जेव्हा अर्थमंत्री पद दिलं गेलं तेव्हासुध्दा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते जसे आपल्या दुःखात सहभागी झालो अगदी तसंच आपल्या सुखातदेखील सहभागी झालो. पुढे जाऊन लोकसभेच्या निवडणुकीचा धुरळा उठला, आपण केलेली विकासकामे सांगत त्याच्याच जोरावर मतदान मागितलं, पण भावनिकतेच्या लाटेपुढे विकासकामांनी जोर धरला नाही. पण मग आपल्या पराभवाला भावनिकतेचं नाव देऊन मोकळे झालो, पण त्याच्यामागे असणारी इतर कारणांची आपण शहानिशा करणार आहोत की नाही? सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं अन जनतेचं खरं मत आपण विचारात घेणार आहोत की नाही? त्यावर देखील चर्चा व्हायलाच हवी. कारण हे खरं अन वास्तवदर्शी मत आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत हेही नाकारून चालणार नाही”, असं स्पष्ट मत कार्यकर्त्याने पत्रात मांडलं आहे.

“दादा, आता तुम्ही विचाराल की ‘त्यांना कुणी अडवलंत?’. अहो त्यांनीच अडवलंय ज्यांनातुम्ही सहकारी संस्था, बँका, स्थानिक स्वराज्य संस्थांची पदं अन दुसऱ्या फळीतील नेतेपद अगदी खिरापत वाटल्यासारखी वाटून टाकलीत. अहो, ही नेतेमंडळी कधी गाडीची काच खाली घेत नाहीत, की कधी कुणाच्या सुख-दुःखात सहभागी होत नाहीत. अन मग अशा वागण्यानं त्यांचा गावातला जनसंपर्क कमी व्हायला असा किती वेळ लागतोय ओ? तुम्ही दिलेल्या पदांचा वापर यांनी सर्वसामान्य लोकांसाठी नव्हे तर यांची घरं भरण्यात अन नातेवाईक आप्तेष्ट मंडळी मोठी करण्यासाठी केलाय. हे मी एकटाच नाही म्हणत अगदी कुठल्याही गावात गेला तरी चारचौघात हीच चर्चा सुरूय अगदी खुल्लमखुल्ला”, असं गऱ्हाणं कार्यकर्ता आपल्या पत्रात करतोय.

अजित पवारांकडे कार्यकर्त्याच्या काय-काय तक्रारी?

“हे झालेत यांनी यांच्या पदाचा केलेला ‘भलताच’ वापर. पण मग आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता आमचं काम घेऊन यांच्याकडे गेलाच तर त्या कामाला टोलवाटोलवीचं उत्तर देणं, वेळप्रसंगी धमकीवजा इशारा अन सुचना देणं हा यांचा उद्योग. आणि यातूनही आम्ही यांना बगल देऊन आपल्या ‘सहयोग’वर किंवा जनता दरबारात यायला निघालो की आलेच आडवे पाय घालायला. अन आम्हाला परावलंबी होऊ न द्यायला… ‘आरं मी करतुकी तुझं काम, आता एवढ्‌यासाठी हिथं दादाकडं आलाय व्हह्य रं?’ असं म्हणून कित्येक पावलं आपल्या घरासमोरून अगदी भिकाऱ्याला हकालल्यागत हाकलून लावलेत. बरं मग यांच न ऐकून, माघारी नाही जाऊन आम्ही काय करायचं शेवटी गावात आम्हाला रोज यांचीच तोंडं बघायचीत”, अशी तक्रार कार्यकर्त्याने अजित पवारांकडे पत्राद्वारे केली.

“अन याच असल्या बरबटलेल्या तोंडांनी हे गावपुढारी मतं मागायला गेली अन त्याचा परिणाम आपल्यासमोर आहेच की. यांचे हे बरबटलेले चेहरे अन श्रेयवादाचा वाद आपल्याच मतदानावर विपरीत परिणाम घडवून आणतोय आणि म्हणूनच म्हणतो या विधानसभेला आधी ही स्वयंघोषित पुढारी दुसऱ्या मतदारसंघात फिरवा अन तुमची निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्ता अन जनतेच्या हातात द्या, इथली लोकं तुम्हाला मताचा जोगवा अगदी खुल्यामनानं वाढतील यात शंकाच नाही”, असं आवाहन कार्यकर्ता अजित पवार यांना करतो.

“दादा, आता थांबतो खूप गाऱ्हाणं घातलं तुमच्या कानावर. आता एक फक्त शेवटचं एवढंच की तुम्ही तालुका दौऱ्यावर असताना हार तुऱ्यांची थैली, गाड्यांचा लवाजमा अन धिप्पाड कार्यकर्ते आणि ठेकेदारांची फौज घेऊन फिरणारे हे गावपुढारी तुमच्या माघारी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि लोकांवर त्यांचं ‘दादा’ पण मिरवायला मोकळे होतात. आम्हाला ‘दादापण’ चालतं ते फक्त अजितदादांचंच… दादा एवढं सगळं ऐकल्यावर तरी तुम्ही तुमच्या माघारी स्वयंघोषित ‘दादा’ होणाऱ्यांचा बंदोबस्त कराल, एवढीच माफक अपेक्षा”, असं अजित पवार यांना उद्देशून कार्यकर्ता पत्राद्वारे आवाहन करतो.