भाजपचं ‘नवाब हटाओ, देश बचाओ’; चोराच्या उलट्या बोंबा, प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

नवाब मलिक यांना अटक झाल्यावर, नवाब जणू काही साधू संत, अहिंसेचे पुजारी असल्यासारखे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राज्य सरकारने आंदोलन केले. हे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते, अशी टीका आता भाजप नेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) केली आहे.

भाजपचं नवाब हटाओ, देश बचाओ; चोराच्या उलट्या बोंबा, प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांची नवाब मलिक यांच्यावर सडकून टीका
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 8:21 PM

पुणे : नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेवरून सध्या राज्याच्या राजकारणात वार पटलवार सुरू आहेत. नवाब मलिक यांना अटक झाल्यावर, नवाब जणू काही साधू संत, अहिंसेचे पुजारी असल्यासारखे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राज्य सरकारने आंदोलन केले. हे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते, अशी टीका आता भाजप नेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) केली आहे. भाजपवर सातत्याने आरोप केला जातो की भाजपा यंत्रणांचा गैरवापर करते. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील कारवाईची मागणी भाजपने केली नाही. सरनाईक निधी गैरव्यवहार प्रकरण, आव्हाड मारहाण प्रकरण, यात भाजपने काय केले? असा सवालही त्यांनी विचारला आहे. तसेच संजय राठोड यांच्यामुळे निष्पाप मुलीला आत्महत्या करावी लागली. ती केस दाबली गेली, हा सत्तेचा गैरवापर आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे.

चोराच्या उलट्या बोंबा-दरेकर

तसेच नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य केल्यावर अटकेचे वॉरंट काढले. पण नाना पटोले यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला, तरी कारवाई नाही. राज्य सरकार सूड भावनेने हे सर्व करत आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. आणि चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत, असेही दरेकर म्हणाले आहेत. तसेच 3 फेब्रुवारी 2022 रोजी दाऊद विरोधात एफआयआर झाला. छाप्यामध्ये जबाब आले. त्यात कुर्ला जागेचा विषय पुढे आला आहे. बॉम्बस्फोटामधील आरोपीची जागा नवाब मलिकने विकत घेतली. दोषी आढळल्यावर ईडीने अटक केली. तेव्हा नैतिकतेच्या मुद्द्यावर याआधी महाराष्ट्रात मंत्र्यांनी राजीनामे दिले. आता ठाकरी बाणा कुठे गेला? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. मी बोलतोय ते त्यांना पटत असेल, पण बोलणार कसे? राष्ट्रवादीने पाठिंबा काढला तर सत्तेचे काय होणार, त्यामुळे मुख्यमंत्री हतबल आहेत. नवाब मलिक देशभक्त असल्याप्रमाणे आव आणला जात आहे. नवाब हटाओ, देश बचाओ, असा नारा त्यांनी दिला आहे.

एफआरपीचा मुद्दा उपस्थित करणार

ऊसाच्या एफआरपीचा गोंधळ सर्वत्र आहे. शेतकऱ्यांना पैसा मिळावा अशीच आमची भावना आहे. त्याबाबत मुद्दा उपस्थित करणार आहे, काही कारखाने मुद्दाम देत नाहीत, काहीची आर्थिक अडचण आहे, असेही ते म्हणाले. तसेच राज्यपालांबाबत बोलताना, राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. त्यांनी केवळ गुरू शिष्य नात्यावर भाष्य केले. जनतेचे लक्ष दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने पराचा कावळा केला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असल्यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न बाजूला पडत आहेत. राज्याचा कर कमी केला तर पेट्रोलचा भाव कमी होतो, असे फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले.फडणवीस काळात हे दर नियंत्रित होते, असेही दरेकर म्हणाले आहेत.

विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात, तर सुप्रिया सुळेंनी जोडले केंद्राला हात

ज्यांना मुलबाळ नाही त्यांना वेदना काय कळणार? नाना पटोले पुन्हा घसरले

नील सोमय्यांना कोर्टाचा पहिला दणका, सत्र न्यायालने फेटाळला अटकपूर्व जामीन