कोरोना वाढतोय, तरी लोकांमध्ये दहशत निर्माण करु नका : प्रवीण दरेकर

| Updated on: Feb 21, 2021 | 6:07 PM

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. पण लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करु नका, असं आवाहन प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांना केलं आहे (Pravin Darekar appeal Maharashtra Government on Corona Pandemic).

कोरोना वाढतोय, तरी लोकांमध्ये दहशत निर्माण करु नका : प्रवीण दरेकर
pravin darekar
Follow us on

पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. पण लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करु नका. कुठलीतरी जुलमी राजवटासारखी कृती करु नका, असं आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार कमी पडलं, असं प्रतिपादन त्यांनी केलं (Pravin Darekar appeal Maharashtra Government on Corona Pandemic).

“रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद संध्याकाळी सात वाजता होणार आहे. भावनिक आवहानापेक्षा, संवादापेक्षा क्षमतेने आणि गतीने कृतीची आवश्यकता आहे. कारण इतर राज्यांमध्ये कोरोना संपुष्टात आला. त्या राज्यांनी व्यवस्था ही क्षमतेने आणि ताकदीने केली. कदाचित आपण कमी पडलो. आपला रिकव्हरी रेट अत्यंत अत्यल्प आहे. कोरोनाने आर्थिक कंबरडं मोडलं तेव्हा इतर राज्यांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले. पण या सरकारने तसे काही आर्थिक पॅकेज जाहीर केलं नाही”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

“कोरोनाबाबत वेगवेगळ्या मंत्र्यांची वेगवेगळे वक्तव्य, कंटेन्मेंट झोन घोषित करु, मार्शल नेमू, अधिकचा दंड वसूल करु, अशाप्रकारचे वक्तव्य मंत्र्यांनी करु नये. भीतीची दहशत निर्माण करण्यापेक्षा आधार देऊन मार्ग काढावा, ही सरकारला विनंती आहे”, असंदेखील ते म्हणाले.

“लोका सांगे ब्रह्म ज्ञान, कोरोना परिस्थितीत महाविकास आघाडीचे नेते ज्या लग्नाला जात आहेत तिथली गर्दी बघा. हजारोचां जनसमुदाय होता. कालच सरोज अहिरे यांचं लग्न झालं. तिथे सर्व महत्त्वाचे नेते होते”, असं दरेकर यांनी सांगितलं (Pravin Darekar appeal Maharashtra Government on Corona Pandemic).

नाना पटोलेंवर निशाणा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन-चार दिवसांपूर्वी एक मोठं धमकी वजा धाडसी विधान केलं. अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट होऊ देणार नाही. धमकी आणि कृतीत फरक असतो. नंतर त्यांनी भूमिका मागे घेतली. आम्ही झेंडे दाखवू, असे ते म्हणाले. आता तेही दाखवतील की नाही ती शंका आहे. खरंतर ही भूमिका महाविकास आघाडी आणि सरकारची आहे का ते मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी जाहीर करावी.

‘अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचं सामाजिक कार्य’

“एका बाजूला अमिताभ बच्चन यांचं सामाजिक योगदान, मिलेट्रीसाठी त्यांनी दिलेलं योगदान, शहीद मिलेट्रीमॅनच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलंय. अक्षय कुमारचंदेखील त्याचप्रकारे काम आहे.”सरकारमध्ये असून सरकारी पक्षातील एक प्रदेशाध्यक्ष अशाप्रकारचं वक्तव्य करतं. त्याबद्दल नेमकी भूमिका काय? हेही स्पष्ट होण्याची अत्यंत आवश्यकता आहे”, असं दरेकर म्हणाले.

‘मंत्र्यांनी नियम पाळावे’

“नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर क्रेनने फुलांचा वर्षाव केला. तेव्हाही हजारोंचा जनसमुदाय होता. धनंजय मुंडे यांना निर्दोषत्व बहाल झाल्यासारखं ते जेव्हा बाहेर निघाले त्याही वेळेला क्रेनने फुलांचा वर्षाव झाला. सरकारच्या नेत्यांनीही नियम पाळावे”, असं आवाहन त्यांनी केलं.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया

“पूजा चव्हाण प्रकरणावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मी वारंवार भूमिका मांडली आहे. तरुणीच्या आत्महत्येला आता 15 दिवस झाली. अजूनही गुन्हा दाखल झाला नाही. अजूनही नेमकं काय झालं हे सांगायला सरकार म्हणून कुणीही पुढे येत नाही. समाजाचे मोर्चे प्लॅन करुन काढले जात आहेत. सरकार पाठीशी घालत आहे. सरकार हे प्रकरण दडपण्याचं प्रयत्न करत आहे की काय अशा प्रकारचा संशय सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतोय”, अशी भूमिका दरेकर यांनी मांडली.

हेही वाचा :

आमच्याकडे पर्याय नाही, नाहीतर कोरोना वाढेल, हजारो लोकं रस्त्यावर मरतील : यशोमती ठाकूर

शिवेंद्रराजेंना मी कोणतंही निमंत्रण दिलेले नाही, पक्षाच्या निष्ठेबद्दल कुणीही काहीही सांगण्याची गरज नाही : शशिकांत शिंदे