‘कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय’, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं वक्तव्य
"माझ्या चित्रपटातील डायलॉग घेऊन मी बोलेन, दोन-दोन वर्ष पाऊस स्वराज्यात पडला नाही तरी थंडीच्या दवावर ज्वारी, बाजरी काढणारी जमात आपली. परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट. हा डायलॉग बोलायचा गरज या व्यासपीठावर यासाठी पडली कारण कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय", असं प्रवीण तरडे आपल्या भाषणात म्हणाले.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पुण्यात आज महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सु्द्धा हजेरी लावली. या सभेत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीदेखील भाषण केलं. यावेळी प्रवीण तरडे यांनी पुण्याबाबत मोठा वक्तव्य केलं. ‘कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय’, असा मोठा दावा प्रवीण तरडे यांनी केलं. तसेच प्रवीण तरडे यांनी मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक मतांनी जिंकून आणण्याचं आवाहन पुण्याच्या नागरिकांना केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत आपल्या मनात असलेला आदरही शब्दांमधून बोलून दाखवला.
“संस्कृतीचं वरदान आहे त्या माणसासमोर आज बोलावं लागतंय. काही नाही, मी माझ्या मित्रासाठी इथे आलो आहे. मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे. मी एवढंच सांगेन, दोस्तीचा हा पॅटर्न आम्हाला सर्वदूर पोहोचवायचा आहे. सालस, सज्जन आणि सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळतंय. माझ्या चित्रपटातील डायलॉग घेऊन मी बोलेन, दोन-दोन वर्ष पाऊस स्वराज्यात पडला नाही तरी थंडीच्या दवावर ज्वारी, बाजरी काढणारी जमात आपली. परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट. हा डायलॉग बोलायचा गरज या व्यासपीठावर यासाठी पडली कारण कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय. पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही. कारण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापजाद्याने या स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलेलं आहे. काही उदारणं दोन-तीन दिवसांपूर्वी घडली त्यावर मान्यवर बोलतीलच. तेवढ्यासाठी हे उदाहरण दिलं”, असं प्रवीण तरडे म्हणाले.
प्रवीण तरडे राज ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाले?
“आज राज ठाकरे आले आहेत. मी एक गोष्ट बोलतो. माझा धर्मवीर चित्रपट आला त्यावेळी त्याच्यातला राज ठाकरेंचा सिनेमातला एक सीन कट झाला, अनेक मनसैनिक माझ्यावर नाराज झाले. राज ठाकरे यांना त्याचं कारण माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील अनेकवेळा आपल्या भाषणात ते सांगितलेलं आहे. राज ठाकरे हे आमचे आदर्श आहेत. कलाकाराच्या पाठिशी एखाद्या पक्षाने किती ठामपणे उभं राहावं हे या शहरातील प्रत्येक कलाकाराने अनुभवलेलं आहे”, असं प्रवीण तरडे म्हणाले.
“मुरलीधर मोहोळचा मित्र, मुळशीचा सुपुत्र म्हणून मी तुम्हाला एवढंच आवाहन करतो, पुढचे काही वर्ष आपल्याला खंबीर नेतृत्व देईल असं नेतृत्व भाजप पक्षाने पुणे शहराला दिलं आहे. त्यांना भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट ज्या लीडने जिंकून आले होते त्याच्यापुढे जाऊन जास्त मतदान करा. आपल्या मुरली अण्णाला मोठ्या डौलात दिल्लीत पाठवा. मुळशी तालुक्याचं एक विशिष्ट आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट मुळशीतून मानगाव मार्गे केली होती. अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार माणसं या भागात राहतात. त्यामुळे ही लूट प्रामाणिकपणे रायगडावर पोहोचली, तो मुळशीतला मावळा आज मोदींनी दिल्लीला पाठवण्याचं ठरवलेलं आहे”, असं प्रवीण तरडे म्हणाले.