
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी प्रकृती अस्वस्थ्याचे कारण पुढे करत राजीनामा दिला होता. पण अवघ्या एका तासात असे काय झाले की धनखड यांना राजीनामा द्यावा लागला असा सवाल विरोधकांनी केला होता. धनखड यांचा पत्ता कट करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता. सरकारमधील वरिष्ठांशी त्यांचे मतभेद झाल्यानंतर त्यांना तडकाफडकी राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत होता. त्यानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना काढून टाकण्यात आल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घातला. दिल्लीतील घडामोडींवर त्यांनी त्याचे स्पष्ट मत नोंदवले.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
उपराष्ट्रपती धनगड यांनी राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकण्यात आलं.अंतर्गत वादामुळे दुर्दैवी पद्धतीने त्यांना पदावरून काढण्यात आलं. धनखड यांना राजकीय हेतूने उपराष्ट्रपती पदावर बसवलं होतं, तेच मुळात चुकीचं होतं. त्यांचा राजीनामा जबरदस्तीने घेतला गेला. ‘दाल में कुछ काला है| ऑल इज नॉट वेल इन दिल्ली’ असा टोला चव्हाण यांनी लगावला. बिहारची निवडणूक पारदर्शक पद्धतीने होईल का याबाबत शंका असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या आरोपामुळे बिहार निवडणुकीविषयी काँग्रेस साशंक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
त्यांचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे
मोहन भागवत मुस्लिम नेत्यांना भेटले मात्र त्यांचे खाने के दात अलग, दिखाने के अलग होते है’, असा टोला त्यांनी लगावला. सर्वधर्मसमभाव, समानतेला तुम्ही मान देणार नसाल तर या गोष्टींना काही अर्थ नाही. देशाची विविधतेची संकल्पना मोडीत काढण्याचा आरएसएसचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.
विधिमंडळात जे घडलं ते लज्जास्पद
विधिमंडळ कायदेमंडळाला एक दर्जा, लोकशाहीच्या मंदिरात जे चालू आहे ते लज्जास्पद’ आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सत्ताधारी आणि मुख्यमंत्र्यांनी शिस्त लावण्याचं काम करावं. सत्ताधारी पक्षाकडून बेशिस्त वर्तन होत आहे हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. सभागृहात वापरली जाणारी भाषा मुलांच्या कानावर पडली तर परिणाम होतील. सभागृहाच्या बाहेर गुंड आणून मारामाऱ्या होत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विषयावर परखड मतं मांडले. त्यांनी रोहित टिळक, प्रवीण गायकवाड यांची सांत्वन भेट घेतली, कोणताही अजेंडा नाही असे स्पष्ट केले. टिळकांचा देशासाठी आणि राज्याची हितासाठी मोठा वारसा असल्याचे ते म्हणाले. दीपक टिळकांनी समर्थपणे चालवलेला वारसा आता रोहितही चालवत आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.