कुणी इथेनॉल, कुणी घासलेट तर वेस्टेड ऑईलपासून पेटवतोय शेगडी… डोकेबाजांनी लढवली अफलातून शक्कल
जागतिक युद्धामुळे इंधनाच्या वाढत्या किमती व गॅस टंचाईने भारताला ग्रासले आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात नागरिकांनी अभिनव उपाय शोधले आहेत. पालघरमध्ये टाकाऊ तेलापासून (वेस्ट ऑईल) बनवलेल्या शेगड्या, कोपरगावात इथेनॉल स्टोव्हचे संशोधन, तर मुंबईत केरोसिन आणि कोळशाचा वापर वाढला आहे.

इराण-इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. इराणच्या कच्च्या तेलावर जगभरातील असंख्य देश अवलंबून असल्याने युद्धामुळे तेलाचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे जगभरात इंधनाची समस्या निर्माण झाली आहे. भारतातही इंधनाची मोठी समस्या झाली आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. तर घरगुती गॅससाठी लोक लाईनीत उभे आहेत. अनेकांनी तर चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. घरगुती गॅस मिळण्यास अडचणी येत असल्याने मुंबई महाराष्ट्रातील नागरिकांनी तर वेगवेगळ्या आयडिया अवलंबण्यास सुरुवात केली आहे. कुणी चूल पेटवण्यासाठी लाकडांचा वापर करत आहे, तर कुणी गोवऱ्यांचा वापर करत आहे. काहींनी तर चक्क इथेनॉलचा वापर सुरू केला आहे. घासलेट आणि वेस्टेड ऑईलपासूनही चुली पेटवल्या जात आहेत. डोकेबाजांनी अफलातून शक्कल लढवल्याने त्यांचा घरगुती गॅसचा प्रश्नही सुटला आहे.
पालघरमध्ये अनोखा प्रयोग
गॅसच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील खोडाळा गावात वेल्डिंग कारागिरांनी अनोखी शक्कल लढवली आहे. टाकाऊ तेलापासून म्हणजे वेस्टेड ऑईलपासून चुली पेटवण्यास सुरुवात केली आहे. एक विशिष्ट प्रकारची शेगडी तयार करून यात वेस्टेड ऑईल टाकून ही शेगडी स्टोव्ह सारखी पेटवली आहे. चंद्रकांत सदाशिव बारगिरे असे शेगडी बनविणाऱ्या वेल्डिंग कारागिरांचे नाव असून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम असणाऱ्या मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावाचा तो रहिवाशी आहे. आखाती देशात सुरू असणाऱ्या युद्धामुळे तुटवडा निर्माण झालेल्या गॅस मुळे आता हॉटेल व्यवसाहिकानी घाबरून न जाता या ही देशी शेगडी त्या प्रत्येकाला तारू शकते, असं चंद्रकांत यांचं म्हणणं आहे.
मुंबईत स्टोव्हवरचा नाश्ता
मुंबई एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यापासून छोटे व्यावसायिक आणि स्टॉलधारक पर्यायी साधनांचा वापर करत आहेत. काही जणांनी केरोसिनवर चालणाऱ्या स्टोव्हचा पुन्हा वापर सुरू केलाय. काही जणांनी कोळश्यांच्या शेगड्यांचा वापर करायला सुरुवात केली आहे. सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशावेळी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी हे मार्ग निवडल्याचं स्टॉलधारक सांगत आहेत. शिवाय सकाळच्या नाश्त्याच्या पदार्थांमध्ये काही रुपयांची वाढ केल्याचंही स्टॉलधारक सांगत आहेत.
कोपरगावात इथेनॉल स्टोव्हचा प्रयोग
अहिल्यानगरच्या कोपरगावातील संजिवनी उद्योग समुहाने गॅसला पर्याय म्हणून संपूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन केलंय. गॅस टंचाईवर मार्ग काढण्यासाठी संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने हा एक अनोखा पर्याय शोधला आहे. पुणे येथील संस्थेच्या सहकार्याने इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन करण्यात आले आहे. यावर सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्यास सर्वांना याचा लाभ होणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी सीएनजी प्लांट उभारून सीएनजी गॅस उत्पादन सुरू केले आहे. आता याच साखर कारखान्याने संजीवनी उद्योग समूहाच्या सहकार्याने व्यावसायिक गॅसला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. देशभरात इथेनॉल निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याच इथेनॉलवर आधारित स्टोव्ह तयार करण्याचे संशोधन पुणे येथील एका संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे व्यावसायिक गॅसच्या तुलनेत या स्टोव्हचा खर्च कमी पडणार असल्याच कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी म्हटलं आहे.
सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला परवानगी देण्यात आली असली तरी देशात अजूनही जवळपास हजार कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉल उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. सरकारने जर इथेनॉल गॅस किंवा इथेनॉल स्टोव्हसारख्या संशोधनांना धोरणात्मक परवानगी दिली, तर सहकारी साखर क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो, असं कोल्हे म्हणाले.
सरकारकडून इथेनॉल गॅस किंवा इथेनॉल स्टोव्हला परवानगी मिळाल्यास वाहतूक खर्चात मोठी बचत होऊ शकते. गॅस सिलिंडरच्या वाहतुकीसाठी लागणारा खर्च आणि इंधन दोन्ही वाचण्याची शक्यता आहे. केनिया सारख्या देशांमध्ये सुमारे पंधरा लाख घरांमध्ये अशा प्रकारच्या स्टोव्हचा वापर होत असल्याचेही सांगितले जाते. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील एका कंपनीसोबत करार करून हे संशोधन करण्यात आले, मात्र अद्याप स्पष्ट धोरण नसल्यामुळे हा प्रकल्प सध्या स्थगित ठेवण्यात आल्याच कोल्हे यांनी सांगितलं.
हाफ डे हॉटेल
व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडर तुटवड्याचा परिणाम रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. रत्नागिरीतल्या हॉटेल व्यवसायामध्ये आता हाफ डे हॉटेलची कन्सेप्ट लागू करण्यात आली आहे. गॅस नसल्याने दुपारनंतर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय या हॉटेल चालकांनी घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या तरी व्यावसयिक गॅस सिलेंडरचं वितरण बंद आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा परिणाम रत्नागिरीतील मिसळ विक्रेत्या हॉटेलांवर झाला आहे. या हॉटेलांमध्ये फक्त मिसळ विकली जात आहे. इतर पदार्थ विक्री केले जात नाहीत.
