शरद पवारांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला अजितदादांचं प्रत्युत्तर; म्हणाले, काही लोक…

| Updated on: Mar 27, 2024 | 1:54 PM

Ajit Pawar on Sharad Pawar and Loksabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीवर बोलताना विरोधी पक्षातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. शरद पवार यांनी मोदींवर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर....

शरद पवारांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला अजितदादांचं प्रत्युत्तर; म्हणाले, काही लोक...
Follow us on

नरेंद्र मोदी जर पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले तर ते देशाचं संविधान बदलतील. त्याचसाठी भाजप आणि विशेषत: नरेंद्र मोदी हे 400 पारचा नारा देत आहेत, असं विधान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटलं होतं. पवारांसोबतच विरोधी पक्षातील इतर नेतेही हीच टीका करताना दिसतात. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. लोकशाहीत कुणी कुणाचं काम करायचं. तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण देश आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. मात्र काही लोकं गैरसमज पसरवत आहेत. जर 2024 मध्ये मोदी सरकार आलं तर ते देशाची राज्यघटना बदलतील… असं काहीही म्हटलं जातंय. पण तसं काहीही होणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांच्या मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर दिलंय. ते पुण्यात बोलत होते.

“देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक”

लोकांनी अनेकदा आम्हाला या मतदारसंघाची प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना संसदेत पाठवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. एकंदरीत राजकीय कल बघता मुरलीधर मोहोळ चांगल्या मतांनी निवडून येण्यास काही अडचण येणार नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. काही लोकं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रीडा क्षेत्रासाठी मी काम केलं आहे,कुठलीही अडचण येऊ दिली नाही. महायुतीच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. महाराष्ट्रचा सर्वांगिक विकास कसा होईल हे बघतोय, असंही अजित पवार म्हणाले.

सगळीकडे साथ हवी- अजित पवार

काही लोक तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. फोन करतील… पण त्याकडं तुम्ही लक्ष देऊ नका. महाराष्ट्र केसरीतील वाद मिटवावा असं मला वाटतंय. खेळात वाद नको. पैलवानांची आम्हाला पुणे जिल्ह्यातील चार ही लोकसभेत हवी आहे. मी काय फक्त बारामती… बारामती करायला आलेलो नाही. मी कोणत्याही स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेलं नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे, असं अजित पवार म्हणाले.

जसा कोल्हापूरच्या तालीम संघाचा विकास आराखडा आहे. तसा आराखडा तयार करण्यात येईल. पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात कुलगुलगुरूंची नेमणूक केलेली आहे. मला तुमची सर्व मतदारसंघात मदत पाहिजे. मी इकडे काय बारामती, बारामती करायला आलो नाही, मला सर्व ठिकाणी तुमची मदत पाहिजे, असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.