वालचंदनगर इंडस्ट्रीजचा आत्मनिर्भर भारताचा नारा, हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्लांटची यशस्वी निर्मिती
जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर कंपनीने मेडिकल ऑक्सिजन प्लांटची यशस्वी निर्मिती केली आहे. वालचंदनगर कंपनीने कमी कालावधीमध्ये ऑक्सिजन प्लांटची यशस्वी निर्मिती केली आहे.
पुणे: जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर कंपनीने मेडिकल ऑक्सिजन प्लांटची यशस्वी निर्मिती केली आहे. वालचंदनगर कंपनीने कमी कालावधीमध्ये ऑक्सिजन प्लांटची यशस्वी निर्मिती केली आहे. आणखी ऑक्सिजन प्लांट बनविण्याचे काम वेगाने सुरु आहे. वातावरणातील हवा घेऊन त्यापासून ऑक्सिजन (प्राणवायू) तयार करण्यात येणार आहे. हे प्लांट नागलँड, झारखंड, त्रिपुरा, राजस्थान राज्यामध्ये पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
डीआरडीओकडून कंपनीवर जबाबदारी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशामध्ये ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवली. अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटापुढे व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ऑक्सिजन प्लांटचे महत्व अधोरेखित झाले. देशामध्ये नव्याने ऑक्सिजन प्लांट निर्मिती करण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पुढाकार घेवून वालचंदनगर कंपनीकडे ऑक्सिजन प्लांट तयार करण्याची जवाबदारी सोपवली, असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी सांगितलं आहे.
डीआरडीओ आणि पीएम केअर्समधून मदत
मेडिकल ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी संरक्षण व संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) व पीएम केअर्सकडून वालचंदनगर कंपनीला मदत मिळाली. वातावरणातील हवा घेवून त्यापासून 250 लीटर प्रति मिनिट व 500 लीटर प्रतिमिनिट ऑक्सिजन निर्मिती करण्याचं तंत्रज्ञान कंपनीने विकसित केलं आहे. आत्तापर्यंत 250 लीटर प्रतिमिनिट ऑक्सिजन निर्मितीचे दहा प्रकल्प नागालँड,त्रिपुरा,झारखंड व राजस्थान मधील हास्पिटला पीएम केअर्समधून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारलाही पुरवठा करण्याची तयारी
देशातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प असावा, यासाठी वालचंदनगर कंपनी प्रयत्नशील आहे. कंपनी सध्या ऐरोस्पेस,मिसाईल,संरक्षण,अणूऊर्जा,पाणबुडीचे गुंतागुंतीचे गिअर बॉक्स निर्मिती करुन देशउभारणीच्या कामामध्ये सातत्याने मदत करत आहेत.महाराष्ट्र सरकारला ज्यावेळी हे ऑक्सिजन प्लांट लागतील त्यावेळी आम्ही लवकरच त्याचा ही पुरवठा करू अशी माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी दिली आहे.
चिराग दोशी नेमकं काय म्हणाले?
वालचंदनगर इंडस्ट्रीजला आता 112 वर्ष झाली आहेत. आमच्या कंपनीचं ध्येय हे मेक इन इंडिया, राष्ट्र उभारणी आहे. आमच्या कंपनीचं उत्पादन साखर, सिमेंट, ऊर्जा आणि आता आम्ही इस्त्रो, डीआरडीओ आणि एनपीसीएल सोबत काम करतो. त्यामागील धोरण मेक इन इंडिया आहे. पंतप्रधानांचा मुद्दा आहे आत्मनिर्भर भारत तो विचार घेऊन देशाची मदत कशी करायची हा विचार केला. आम्ही सॅनिटायझेशन टँक बनवले. डीआरडीओनं आमच्याशी संपर्क केला आणि मेडिकल ऑक्सिजन प्लांट बनवायचे आहेत, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांना होकार देत आम्ही दहा ऑक्सिजन प्लाँट बनवले आहेत. दहा प्लांट विविध राज्यांना पाठवले आहेत. 250 लीटर प्रति मिनिट क्षमतेचे प्लांट पाठवले आहेत. आम्ही देशासाठी योगदान देत आहोत याचा आनंद आहे, असं चिराग दोशी म्हणाले आहेत.
इतर बातम्या:
Pune Indapur Walchandnagar Industries making Oxygen Plant and sent to various states