पुणे पोटनिवडणुकीत पेठांमध्ये कमी झालेल्या मतदानाचा धक्का कोणाला बसणार?

| Updated on: Feb 28, 2023 | 8:13 AM

कसबा पेठेमध्ये भाजपची हक्काची व्होटबँक पेठा आहेत. कसबा पेठेतील सदाशिव, नारायण, शनिवार पेठांमधील मतदानाची टक्केवारी 2019 च्या तुलनेत पाच टक्के घटल्याचे समोर आले आहे.

पुणे पोटनिवडणुकीत पेठांमध्ये कमी झालेल्या मतदानाचा धक्का कोणाला बसणार?
Kasba Peth By Election
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. कसबापेठ विधानसभा मतदार संघात ५०.०६ टक्के मतदान झाले. परंतु पोटनिवडणूक असताना राजकीय पक्षांच्या अपेक्षेपेक्षा जवळपास दहा टक्के मतदान जास्त झाले. मात्र, पेठांमध्ये कमी मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 2 मार्च रोजी होणार आहे.

निवडणुकीत आक्रमक प्रचार झाला. हिंदुत्व, मतदार संघातील प्रश्न यावर भर दिला गेला होता. मतदान पूर्ण झाल्यानंतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बुथनिहाय विश्लेषण करत विजयाची आकडेवारी मांडत आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपची व्होटबँक

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची हक्काची व्होटबँक पेठा आहेत. कसबा पेठेतील सदाशिव, नारायण, शनिवार पेठांमधील मतदानाची टक्केवारी 2019 च्या तुलनेत पाच टक्के घटल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये आमदार मुक्ता टिळक यांना या विभागातून तब्बल 21 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता हा धक्का नेमका कुणाला बसणार, यावर चर्चा सुरु झाली आहे. परंतु भाजपचे हक्काचे मतदार असल्याने त्या पक्षाला हा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपचा मतदार


कसबा मतदार संघात महापालिकेचे प्रभाग क्र. 15, 16, 17, 18, 19 आणि 29 हे सहा प्रभाग येतात. त्यामधील प्रभाग 15 आणि 29 हे दोन प्रभाग मतदारसंघाच्या छत्रपती शिवाजी रस्त्याच्या पश्चिम भागात येतात. या दोन्ही प्रभागात भाजपला मानणारा मोठा मतदारवर्ग आहे.2019 मध्ये सदाशिव-नारायण पेठ या प्रभाग क्र. 15 मध्ये आणि नवी पेठ-पर्वती या प्रभाग क्र. 29 या दोन्ही प्रभागांत भाजपचे वर्चस्व राहिले होते. प्रभाग क्र. 15 मध्ये 57 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये तब्बल 68 टक्के मते भाजपच्या उमेदवाराला होती. त्यामुळे 21 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता मात्र ही टक्केवारी पाच टक्के इतकी घटून 51.89 टक्के इतके म्हणजे 37 हजार 237 टक्के मतदान झाले आहे.

मविआला धाकधूक


प्रभाग क्र. 29 मध्ये दोन टक्के इतके मतदान घटले आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. उर्वरित प्रभाग क्र. 16, 17, 18, 19 या प्रभागांत मतदानाच्या टक्केवारीत अर्धा ते दोन टक्के फरक पडलेला आहे. हे भाग प्रामुख्याने पूर्व भागात येतात. या ठिकाणी महाविकास आघाडीला अधिकाधिक आघाडीची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात या प्रभागातील मतदानाची टक्केवारी वाढलेली नाही. त्यामुळे काँग्रेसची धाकधुक वाढली आहे.